नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवार, १९ जुलैपासून सुरुवात होणार आहे. शेतकरी आंदोलन, कोरोनाची दुसरी लाट आणि तिसर्या लाटेची भीती तसेच केंद्र सरकारची व्यापक लसीकरण मोहीम या पृष्ठभूमीवर हे अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात एकूण २३ विधेयक सरकारकडून प्रस्तावित आहेत. त्यापैकी ६ जुनी तर १७ नवी विधेयके आहेत.
१९ जुलै ते १३ ऑगस्ट असा अधिवेशनाचा कालावधी आहे. कोरोनामुळे मागच्या अधिवेशनात संसदेची दोन्ही सभागृहे दोन सत्रात चालवावी लागली होती. यावेळी मात्र दोन्ही सभागृहे एकाचवेळी सकाळी ११ ते ६ या वेळेत चालणार आहेत. मोदी सरकारच्या नव्या मंत्र्यांची या अधिवेशनातील ही पहिलीच परीक्षा असणार आहे.