मुंबई : वृत्तसंस्था
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर निर्माण झालेल्या शंका-कुशंकांना आता नवे वळण मिळाले आहे. अपघात की घातपात, या चर्चेमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या प्रकरणी आमदार रोहित पवार सातत्याने प्रश्न उपस्थित करत असून आता खासदार Supriya Sule यांनीही मौन सोडत पहिल्यांदाच स्पष्ट भूमिका मांडली आहे.
गेल्या २८ जानेवारी रोजी अजित पवार यांचे खासगी विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत त्यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली. मात्र काही दिवसांतच या दुर्घटनेविषयी विविध शंका उपस्थित होऊ लागल्या.
रोहित पवार यांनी आतापर्यंत तीन वेळा पत्रकार परिषद घेऊन तपासाच्या गतीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी काही तांत्रिक बाबी, विमानाची देखभाल आणि संबंधित उड्डाण सेवा देणाऱ्या कंपनीबाबत प्रश्न उपस्थित करत तपास जलद, निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने व्हावा, अशी मागणी केली.
दरम्यान, अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी सामाजिक माध्यमांवर पोस्ट करत ‘ब्लॅक बॉक्स’ संदर्भात शंका व्यक्त केली. विमान दुर्घटनेत ब्लॅक बॉक्स पूर्णपणे नष्ट होणे अशक्यप्राय असल्याचे नमूद करत त्यांनी या बाबत सखोल चौकशीची मागणी केली. महाराष्ट्रातील जनतेला या घटनेचे संपूर्ण आणि निर्विवाद सत्य जाणून घेण्याचा अधिकार आहे, असे त्यांनी ठामपणे लिहिले. संबंधित कंपनीवर तातडीने बंदी घालण्याची मागणीही त्यांनी केली.
या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी सामाजिक माध्यमांवर सविस्तर भूमिका स्पष्ट केली. “अजितदादांच्या अपघाती मृत्यूनंतर महाराष्ट्र हादरला आहे. समाजमाध्यमांवर विविध शंका व्यक्त होत आहेत आणि जनभावना तीव्र आहेत. अशा वेळी रोहित पवार अभ्यासपूर्ण पद्धतीने काही मुद्दे मांडत आहेत. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळालीच पाहिजेत,” असे त्या म्हणाल्या.
तपासात विलंब होत असल्यास अस्वस्थता वाढू शकते, ती टाळण्यासाठी संपूर्ण सत्य पारदर्शकपणे लोकांसमोर आणणे आवश्यक असल्याचे सुळे यांनी नमूद केले. व्यवस्थेला प्रश्न विचारणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनादत्त अधिकार आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.
याचबरोबर सुप्रिया सुळे यांनी रोहित पवार यांच्या सुरक्षेचा मुद्दाही उपस्थित केला. सध्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना कडेकोट सुरक्षा देण्यात यावी आणि त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. अलीकडील पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी कुटुंबीयांना त्यांच्या सुरक्षेबाबत चिंता वाटत असल्याचे सांगितले होते.
अजित पवार यांच्या निधनानंतर सुरू झालेली ही चर्चा आता अधिक गंभीर वळणावर आली आहे. कुटुंबीयांकडून उपस्थित होणारे प्रश्न, ब्लॅक बॉक्सबाबतची शंका, तपासाच्या गतीवरील नाराजी आणि आता सुप्रिया सुळे यांची पारदर्शक चौकशीची मागणी यामुळे या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. पुढील काही दिवसांत तपास यंत्रणा काय भूमिका घेते आणि उपस्थित शंकांचे निरसन कसे होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.