मुंबई : वृत्तसंस्था
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी दिवंगत अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूबाबत पुन्हा एकदा गंभीर संशय व्यक्त करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. 15 जानेवारीपर्यंत अजित पवारांनी केलेली विधाने आणि त्यानंतर त्यांना अप्रत्यक्षपणे दिले गेलेले इशारे पाहता 28 जानेवारीला झालेला विमान अपघात हा केवळ योगायोग आहे की त्यामागे षडयंत्र आहे, याचा तपास यंत्रणांनी शोध घ्यावा, असे त्यांनी म्हटले आहे.
28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले. या घटनेनंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील काही आमदारांनी हा केवळ अपघात नसून संभाव्य घातपात असू शकतो, असा संशय व्यक्त केला होता. या प्रकरणावर विधिमंडळात चर्चा व्हावी, अशी मागणीही करण्यात आली होती. मात्र ही चर्चा वारंवार पुढे ढकलली जात असल्याने प्रश्न अधिकच गडद होत असल्याचे जाधव यांनी सांगितले.
भास्कर जाधव म्हणाले की, “अजित पवारांचा मृत्यू हा अपघात होता की घातपात, हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. देशातील आणि राज्यातील अनेकांनी ही घटना पाहिल्यानंतर ती साधा अपघात नसावा, अशी भावना व्यक्त केली होती आणि आजही ती कायम आहे.”
भास्कर जाधव यांनी अजित पवारांच्या काही विधानांचा उल्लेख करत या संशयाला अधिक बळ मिळत असल्याचे म्हटले. पिंपरी चिंचवड येथे केलेल्या भाषणात अजित पवारांनी, “ज्यांनी माझ्यावर 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांच्याच मांडीला मांडी लावून मी सरकारमध्ये बसलो आहे,” असे वक्तव्य केले होते, असे जाधव यांनी सांगितले.
या विधानानंतर काही नेते व मंत्र्यांकडून अजित पवारांना अप्रत्यक्षपणे इशारे देण्यात आले, असा दावा जाधव यांनी केला. “तुमची फाईल अजून निकाली निघालेली नाही, तुमची केस कोर्टात आहे, तोंडाला लगाम लावा,” अशा प्रकारचे संदेश त्यांना देण्यात आले होते, असे त्यांनी सांगितले.
तसेच 15 जानेवारी रोजी अजित पवारांनी पुन्हा एकदा, “भाजपच्या मोठ्या भ्रष्टाचाराची फाईल माझ्याकडे आली आहे,” असे वक्तव्य केले होते, असेही जाधव यांनी नमूद केले. या सर्व घटनांनंतर काही दिवसांतच त्यांचा अपघात होणे हा केवळ योगायोग आहे की षडयंत्र, याबाबत शंका निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकरणी आतापर्यंत महाराष्ट्र सरकार किंवा केंद्र सरकारकडून अधिकृत निवेदन झालेले नाही, अशी टीकाही जाधव यांनी केली. त्यांनी म्हटले की, “या घटनेबाबत सरकारने स्पष्ट भूमिका मांडली पाहिजे. तपास यंत्रणांनी सखोल चौकशी करून सत्य समोर आणले पाहिजे.” तसेच देशाचे पंतप्रधान मोदी यांनीही या प्रकरणावर कोणतेही विधान केलेले नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणात काहीतरी संशयास्पद असल्याची भावना अधिकच बळकट होत असल्याचे सांगत जाधव यांनी “दाल में कुछ तो काला है,” असे म्हणत सरकारवर सवाल उपस्थित केला.