मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या चार ते पाच महिन्यापासून बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीने राज्याच्या राजकारणात अनेक खळबळजनक घटना घडल्या होत्या. आता वाल्मीक कराडचा एन्काऊंटर करण्यासाठी 5 कोटी ते 50 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती, असा दावा बीडचे निलंबित पोलिस अधिकारी रणजित कासले यांनी केला आहे. कासले यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून म्हटले आहे की, मी एन्काऊंटर करू शकतो. माझ्यात दम होता. हे त्यांना माहिती होते म्हणून त्यांनी सायबरमधून तिकडे बोलवून घेतले. मी काही माझा मोठेपणा सांगत नसल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
रणजित कासले पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केवळ बीडला घाबरतात. ते तिथे येत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिथे सभा झाली, पण फडणवीस आले नाहीत. पोलिस अधिकारी म्हणून मला गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची लाज वाटते. 10 वर्षात त्यांनी काय केले. त्यांच्या पत्नी पोलिसांच्या पैशावर आपला खर्च भागावतात असा आरोपही त्यांनी केला आहे.
रणजित कासले म्हणाले की, एन्काऊंटर करण्यापूर्वी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि गृह सचिवांची एक गुप्त बैठक होते. या बैठकीत ठरवले जाते की प्रकरणामध्ये काय करायचे. मग एक 5 ते 6 विश्वासू लोकांची टीम तयार केली जाते. मग ठरलेल्या ठिकाणी जातात. यामध्ये पोलिसांची टीम तयार केली जाते. त्यांना 5 कोटी ते 50 कोटी अशी ऑफर दिली जाते, यासह आमचे सरकार आहे तुम्हाला पुन्हा नौकरीमध्ये घेतले जााईल, चौकशीमधून तुम्हाला बाहेर काढू असे आश्वासन दिले जाते.
रणजित कासले म्हणाले की, अक्षय शिंदे प्रकरणात 5 पोलिसांवर गुन्हे दाखल करा, एसआयटी बसवा, अशी बातमी मी टीव्हीवर बघितली. ही एसआयटी बसवून काहीही उपयोग होणार नाही. एसआयटीची बसवायची असेल तर केंद्राची एसआयटी बसवा, तरच यामधून सत्य समोर येईल. त्यांचे हातपाय बांधलेले होते यातून तो बोगस एन्काऊंटर होता असा आरोप कासले यांनी केला आहे. तर हे सरकार आणि विरोधक नंपुसक आहेत, अक्षय शिंदे प्रकरणी आरोपी करायचे असेल तर ते गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले पाहिजे.