मुंबई : वृत्तसंस्था
मुंबईतील वांद्रे परिसरात १८ जुलै २०२५ रोजी सकाळी एक भीषण दुर्घटना घडली. भारत नगर येथील चाळ क्रमांक ३७ ही तीन मजली इमारत अचानक कोसळली, आणि १२ जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
घटना सकाळी सुमारे ७:५० वाजता घडली. प्राथमिक तपासात इमारतीत सिलिंडरचा स्फोट झाल्याचे निदर्शनास आले असून, त्यानंतर इमारतीचा मोठा भाग कोसळला. या घटनेनंतर मुंबई अग्निशमन दलाने (MFB) तत्काळ ‘लेव्हल-२ अलर्ट’ जारी करून बचावकार्य सुरू केले. बचाव कार्यात अग्निशमन दल, मुंबई पोलीस, बीएमसी, म्हाडा, पीडब्ल्यूडी, अदानी ग्रुप, 108 रुग्णवाहिका सेवा आणि वॉर्ड कर्मचारी यांचा समावेश होता.
अधिकार्यांच्या माहितीनुसार, घटनास्थळी २ ADHO, ५ वरिष्ठ अधिकारी, ५ फायर इंजिन्स, १ कमांड आणि कंट्रोल युनिट, १ रेस्क्यू वाहन, १ मोबाईल वर्कशॉप आणि इतर बचाव यंत्रणा कार्यरत आहेत. १२ जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुदैवाने जीवितहानीची माहिती अद्याप समोर आलेली नाही. ही दुर्घटना घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनीही तत्परतेने मदतीसाठी पुढाकार घेतला. अनेकांनी ढिगारा हटवण्यासाठी यंत्रणेला सहकार्य केले.
सतर्कतेचा इशारा
या घटनेनंतर मुंबईतील जुन्या व जीर्ण चाळींच्या दुरुस्तीकडे आणि संरचनात्मक सुरक्षिततेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली आहे. प्रशासनाने तत्काळ याचा आढावा घ्यावा, अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे. सध्या बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू असून, परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा कार्यरत आहेत.