ध्यास विश्वसार्ह बातमीचा

तुकाराम मुंढे ॲक्शन मोडवर : बोगस दिव्यांगांची होणार झाडाझडती !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात आपल्या धडाडीच्या कामासाठी ओळखले जाणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे पुन्हा एकदा ॲक्शन मोडवर आले आहेत. सध्या राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून कार्यरत असलेल्या मुंढे यांनी, बोगस दिव्यांग प्रमाणपत्र वापरून सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्यांविरुद्ध मोठी मोहीम हाती घेतली आहे. त्यांनी राज्यातील सर्व 34 जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना यासंदर्भात लेखी आदेश दिले आहेत.

या आदेशानुसार, जिल्हा परिषदेतील शिक्षण, आरोग्य, बांधकाम यासह सर्व विभागांतील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. या आदेशामुळे बोगस प्रमाणपत्र वापरणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

तुकाराम मुंढे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून त्यांच्या भूमिकेचे स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. त्यांना समाजात योग्य स्थान मिळवून देणे आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणणे हे आपले कर्तव्य आहे. ‘समावेशन, सन्मान आणि समान संधी’ यावरच खऱ्या अर्थाने सक्षम समाजाची पायाभरणी होते, असेही त्यांनी म्हटले आहे.

दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ नुसार, बोगस दिव्यांग व्यक्तीला दोन वर्षांपर्यंत कारावास किंवा एक लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. दिव्यांग कल्याण विभागाकडे अशा अनेक तक्रारी आल्या आहेत, ज्यात अनेक कर्मचारी बोगस दिव्यांगत्वाचा लाभ घेत असल्याचे म्हटले आहे. या तक्रारींची दखल घेऊन मुंढे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना महिन्याभरात तपासणीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. जर एखाद्याचे प्रमाणपत्र बनावट किंवा चुकीचे आढळले, किंवा दिव्यांगत्वाचे प्रमाण ४० टक्क्यांपेक्षा कमी असेल, तर अशा कर्मचाऱ्यांना मिळणारे सर्व लाभ तात्काळ बंद करावेत आणि त्यांनी आतापर्यंत घेतलेल्या लाभांवर कारवाई करावी, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. या मोहिमेमुळे खऱ्या दिव्यांगांना त्यांच्या हक्कांपासून वंचित राहावे लागणार नाही, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

तुकाराम मुंढे हे 2005 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ऑगस्ट 2005 मध्ये सोलापूर येथून प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांनी प्रशासकीय कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर, विविध जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि सचिवपदी त्यांची धडाकेबाज कामगिरी चर्चेत राहिली. कर्मचाऱ्यांना कडक शिस्त लावण्याच्या हेतूनं तुकाराम मुंढे निर्णय घेतात. तेच त्यांच्या बदलीचं कारण ठरते, अशी चर्चा नेहमीच असते. शिवाय स्थानिक लोकप्रतिनिधींशी फारसं जमत नसल्यामुळेही त्यांच्या नियुक्तीला अनेकजण विरोध करत असल्याचा आतापर्यंतचा इतिहास आहे. 20 वर्षांच्या कारकीर्दीत त्यांची तब्बल 23 वेळा बदली झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!