मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात नुकतेच काल स्थानिक निडणुकीचा बिगुल वाजला आहे तर दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजपासून मराठवाडा दौऱ्यावर आले आहेत. “दगाबाज रे” संवाद दौऱ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. 5, 6, 7 व 8 नोव्हेंबर रोजी असे 4 दिवस ते मराठवाडयातील शेतकऱ्यांशी थेट गावातील पारावर व बांधावर जाऊन राज्य सरकारने सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी नुकसानीची भरपाई प्रत्यक्षात मिळाली की नाही याची माहिती घेणार आहे.
दुसरीकडे, केंद्राचे पथक देखील नुकसानीची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्रात दाखल झाले आहे. केंद्रीय पथकाने मंगळवारी रात्री मोहोळ भागात पाहणी केली. आज ते सकाळी सोलापूर जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी दाखल झाले आहेत.
उद्धव ठाकरे हे सध्या पैठण तालुक्यातील नांदेर या गावात दाखल झाले आहेत. या ठिकाणी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारकडे तत्काळ शेतकरी कर्जमाफी केल्याची मागणी केली. सरकारने सध्या जाहीर केलेले पॅकेज आम्हाला मान्य नाहीच, पण आता जाहीर केलेच आहे, तर ते तरी लवकर द्या, असा टोला उद्धव ठाकरे यांनी सरकारला लगावला.
मागील महिन्यात राज्यभरात पावसाने हाहा:कार माजवला होता. विशेषतः मराठवाड्यातील धाराशिव, बीड, जालना, लातूर, परभणी या जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांचे संपूर्ण पिके पाण्याखाली गेले. अनेक ठिकाणी तर जमिनीवरील मातीही खरडवून निघाली होती. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून, त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. शिवाय शेतकरी कर्जमाफीची मागणी केली होती.
5 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील नांदर येथील शेतकऱ्यांशी संवाद साधणार. सकाळी 11.30 वाजता बीड जिल्ह्यातील पाली, दुपारी 2 वाजता धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पाथ्रुड, दुपारी 3.30 वाजता धाराशिव जिल्ह्यातील शिरसाव, सायंकाळी 5 वाजता सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील घारी, 6 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता धाराशिव जिल्ह्यातील करजखेडा, सकाळी 11.30 वाजता लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील भुसणी येथील, दुपारी 1.30 वाजता अहमदपूर तालुक्यातील थोरलेवाडी सायंकाळी 4 वाजता नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील पार्डी, 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील पार्डी, सकाळी 11.30 वाजता हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा, दुपारी 2 वाजता हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यातील जवळाबाजार, तर 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील ताडबोरगाव, सकाळी 11.30 वाजता परभणी जिल्ह्यातील सेलु ढेगळी पिंपळगाव, दुपारी 2 वाजता जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील पाटोदा व घनसावंगी तालुक्यातील लिंबोनी येथील शेतकऱ्यांशी ठाकरे संवाद साधणार आहे.