ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मराठवाडासह पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे संकट कायम !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील वाढत्या उष्णतेमुळे अंगाची लाहीलाही होत असलेल्या मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात मंगळवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उष्णतेपासून दिलासा मिळाला. पण अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचे मात्र नुकसान झाले.

पुणे, पिंपरी-चिंचवड, मराठवाड्यातील जालना, लातूरच्या काही भागात मंगळवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगरात २.४ मिमी पावसाने वीज गूल झाली. सातारा जिल्ह्यातील कराडला विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने दोन तास झोडपून काढले. गारांचाही वर्षाव झाला. वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली होती. वीजपुरवठा खंडित झाला. अहिल्यानगर शहर व जिल्ह्यातील काही भागातही तुरळक पाऊस झाला.

बुधवारी व गुरुवारीही हवामानातील बदल कायम राहणार असल्याने विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत गारपिटीसह पाऊस होणार असल्याचे पुणे हवामान खात्याने सांगितले.

जालना जिल्ह्यातील भोकरदनमध्ये संध्याकाळी सहा वाजेनंतर विजांच्या कडकडाटात पाऊस झाला. यामुळे रब्बीतील काढणीला आलेला गहू, हरभरा, मका पिकाचे नुकसान झाले. आंब्याच्या फळांचेही नुकसान झाले. सिल्लोड तालुक्यात रात्री हलक्या सरी बरसल्या. पण सारोळा येथे वीज पडून म्हैस ठार झाली. पैठण, वैजापूरमध्ये पिकांचे नुकसान झाले.

वाऱ्याची चक्रीय स्थिती, दक्षिण छत्तीसगडपासून तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा, बंगालच्या उपसागरात आग्नेय दिशेला तयार झालेली चक्रीवादळाची स्थिती यामुळे भर उन्हाळ्यात पावसाचा शिडकावा पडला. बुधवारीही काही भागात वाऱ्याचा वेग ताशी ४० किमी राहणार असल्याचे आयएमडीकडून सांगण्यात आले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!