मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील हिंदुत्ववादी नेते म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नीतेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून एक महत्त्वाची मागणी केली आहे. येत्या 25 ऑगस्ट रोजी येणारी वराह जयंती राज्यभर अधिकृतपणे साजरी करण्यात यावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.
वराह जयंतीचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व स्पष्ट करताना राणे यांनी पत्रात म्हटले आहे की, हिंदू धर्मातील दशावतारांपैकी वराह देव हा तिसरा अवतार आहे. ते वसुंधरेचे रक्षक आणि दुष्ट प्रवृत्तींचा नाश करणारे आहेत. वराह देवाची पूजा केल्याने समाजात धर्म, सदाचार आणि पर्यावरण रक्षणाची जाणीव निर्माण होते, असेही त्यांनी नमूद केले.
नीतेश राणे यांनी म्हटलंय की, हिंदू धर्मातील दशावतारांपैकी वराह देव (भगवान) हा तिसरा अवतार मानला जातो. या वसुंधरेचा वराह देव हा संवर्धक व रक्षक असून सर्व प्रकारच्या दुष्ट प्रवृत्तीचानाश करणारा आहे. 25 ऑगस्ट रोजी वराह जयंती येत असून, या दिनाचे धार्मिक तसेच सांस्कृतिक महत्त्व अपार आहे. वराह भगवानाच्या पूजनाने वसुंधरा, समाजात धर्म, सदाचार व पर्यावरण रक्षणाची जाणीव जागृत होते.
25 ऑगस्ट हा दिवस राज्यभर ‘वराह जयंती उत्सव दिन’ म्हणून घोषित करावा., शासनामार्फत जिल्हा पातळीवर आणि प्रमुख शहरांमध्ये सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करावे., शाळा आणि महाविद्यालयांमध्ये वराह देवाच्या इतिहासावर आणि संदेशावर व्याख्याने आयोजित करावीत., मंदिरांमध्ये विशेष पूजा-अर्चा आणि भक्ती कार्यक्रमांचे आयोजन करावे.
नीतेश राणे यांनी म्हटलंय की, हिंदू समाजामध्ये या जयंतीबद्दल मोठा आदरभाव असून, राज्यभर ही जयंती अधिकृतरीत्या साजरी व्हावी, अशी जनतेची अपेक्षा आहे. शासन स्तरावर या दिवशी विशेष कार्यक्रम, प्रवचन, सांस्कृतिक उपक्रम तसेच मंदिरांमध्ये पूजा-अर्चा आयोजित केली जावी, यासाठी योग्य तो अधिसूचना देण्यात यावी, ही नम्र विनंती, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.