ध्यास विश्वसार्ह बातमीचा

काय वाटेल ती किंमत देऊ पण…; शरद पवारांच्या विधानाने राजकीय चर्चेला उधान !

मुंबई : वृत्तसंस्था

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी आणि मराठा समाजाचा सामाजिक समतोल ढासळत चालल्याचे दिसून येत आहे. याचदरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेले विधान चर्चेत आले आहे.

‘महाराष्ट्र हा सामाजिक ऐक्य जपणारा प्रदेश आहे. मात्र आजच्या परिस्थितीकडे पाहिले तर सामाजिक सौहार्दाची वीण तुटत आहे. राज्यातील सामाजिक सलोखा बिघडत असताना एकोप्याचे बंध मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. काय वाटेल ती किंमत देऊ पण महाराष्ट्र एकसंघ कसा राहील यासाठी प्रयत्न करू,’ असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

आंबे दिंडोरी येथे कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या स्मारकाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी शरद पवार बोलत होते. “सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र कसे ठेवता येईल, महाराष्ट्राचा लौकिक कसा वाढतात येईल यासाठी काम करू, त्यासाठी आजचा कार्यक्रम महत्वाचा आहे. सामाजिक ऐक्यासाठी हे स्मारक उपयोगी ठरेल,” असे म्हणत शरद पवारांनी सध्या राज्यात सुरू असलेल्या मराठा-ओबीसी आरक्षणाच्या वादावर अप्रत्यक्षपणे भाष्य केलं.

स्मारक उद्घाटनानंतर शरद पवारांनी आपल्या भाषणात दादासाहेब गायकवाड यांच्या आठवणींना उजाळा दिला. “खासदार दादासाहेब गायकवाड हे नाव एकेकाळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात खोलवर रुजलेल होते. ज्यांची सुरुवात व्यक्तीगत जीवनात कारकून म्हणून झाली, नंतरच्या काळात हिंदुस्थान अखंड राष्ट्र झाले, त्यानंतर गायकवाड यांची नियुक्ती कराचीमध्ये झाली. पण, त्यांनी कराची सोडले आणि इथे आले. त्यानंतर स्वतंत्र मजूर पक्षात गायकवाड यांनी प्रवेश केला आणि त्यानंतर मजूर पार्टीचे आमदार झाले. मराठी भाषिकांचे राज्य करण्याची आवश्यकता भासली, तेव्हा इंदिरा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांना त्यांनी पत्रव्यवहार केला, आणि मराठी राज्य तयार केले, ज्याचे नेतृत्व चव्हाण साहेबांनी केले,” असा इतिहास शरद पवारांनी उलगडला.

“आज देशाच्या सुप्रीम कोर्टाचे नेतृत्व भूषण गवई करतात, त्यांचे वडील रा. सु. गवई 20 वर्षे लोकप्रतिनिधी होते. त्या ज्या पक्षातून निवडून आले त्या पक्षाच्या युतीचा पाया दादासाहेब गायकवाड यांनी रचला. काळाराम मंदिराचा सत्याग्रह जेथे झाला तेथे दादासाहेब उभे राहिले. त्यांचा नावलौकिक संपूर्ण देशात पसरला आहे. त्यामुळे महाराष्ट्र एकसंघ ठेवण्यासाठी यशवंतराव चव्हाण आणि दादासाहेब गायकवाड यासारख्या व्यक्तींचा आदर्श घेऊन जातीपातीचे राजकारण थांबवणे गरजेचे आहे,” असेही यावेळी शरद पवार म्हणाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!