ध्यास विश्वसार्ह बातमीचा

…अजून काय बरबाद करणार? हल्ल्यानंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया !

मुंबई : वृत्तसंस्था

भारतीय लष्कराने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करत पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर दिले आहे. भारताच्या या कारवाईनंतर पहलगामच्या पीडितांबरोबर सर्वसामान्यांनीही याचे कौतुक केले आहे. या कारवाईनंतर प्रतिक्रिया देताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी, “दहशतवादी हल्ल्याचं उत्तर युद्ध नसतं”, असं म्हटले आहे.

राज ठाकरे म्हणाले, “पाकिस्तानला धडा शिकवणे आवश्यक होते. दहशतवादी हल्ल्याचे उत्तर हे युद्ध असू शकत नाही. युद्धजन्य परिस्थिती आणायची, मॉक ड्रील आणि सायरन वाजवायचे. मुळात हे का घडलं? याचा विचार करणे गरजेचे आहे. इतके पर्यटक असताना तिथे सुरक्षा का नव्हती हे महत्त्वाचे आहे,” असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

“पाकिस्तान आधीच बरबाद झालेला देश आहे, त्याला अजून काय बरबाद करणार? हल्ला करणारे अतिरेकी तुम्हाला सापडलेले नाहीत. एअर स्ट्राईक करून, लोकांना भरकटवून, हा काही पर्याय अथवा उत्तर होऊ शकत नाही. सरकारच्या चुका तुम्हाला दाखवल्याच पाहिजेत. मॉक ड्रील, एअर स्ट्राईक करणे हे काही या गोष्टीवर उत्तर नाही. अतिरेक्यांना शोधून त्यांचा बंदोबस्त करणे आणि देशभर मॉक ड्रील करण्यापेक्षा कोंबिग ऑपरेशन केले पाहिजे, असेही राज ठाकरे म्हणाले.

“ऑपरेशन सिंदूर नाव देता हे महत्त्वाचे नाही. नावाने कुणी भावनिक होत नाही. तुम्ही काय पाऊले उचलता ते महत्त्वाचे आहे. जेव्हा हल्ला झाला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियात होते. तिथून येऊन ते बिहारला गेले. मुंबईत कार्यक्रम केले. हे सर्व करण्याची काही गरज नव्हती. आपल्या देशाचे प्रश्न संपत नाहीत. युद्ध कुठे करणार आहात?”, असेही यावेळी राज ठाकरे यांनी म्हंटले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!