नागपुर : वृत्तसंस्था
आज राज्यातील हिवाळी अधिवेशनाच्या तिसरा दिवस असून ठाकरेसेना आमदार सुनील प्रभू यांनी लाडकी बहीण योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची लक्षवेधी सभागृहात मांडली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 12 हजार 431 पुरुषांनी प्रत्येकी 1500 रुपये घेऊन 164 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप प्रभू यांनी केला. प्रभू यांच्या या लक्षवेधीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील, मंत्री आदिती तटकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले मत सभागृहात मांडले.
जेव्हा ही योजना आली, तेव्हा अशा अटी सांगितल्या होत्या का? ज्यांनी या योजनेची चुकीचे फायदे घेतले त्यांच्यावर कारवई होणार का?, आता योजना जड होऊ लागल्याने केवायसीसाठी आता 13 कंडिशन टाकल्या आहेत. याआधी त्या नव्हत्या, अशी टीका आमदार जयंत पाटील यांनी केली.
यावरती मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, पहिल्याच शासन निर्णयातच 2 कोटी 63 लाख लोकांची पडताळणी सुरू केली आहे. इतर विभागतही आम्ही डेटा तपासत आहोत. ई-केव्हायसीचे धोरण आणले. अनेक महिलांचे बँकेत खाते नाही. त्यामुळे त्या महिलांनी या पैशांसाठी घरातील कर्त्या पुरूषाचे खाते दिले आहे.
यासाठीच केवायसी आपण केली अशी माहिती आदिती तटकरेंनी सभागृहात माहीती दिली. त्याचप्रमाणे ज्या पुरूषांच्या बँक खात्यांवर पैसे जमा झाले ती खाती तपासली जातील. या योजनेचा फायदा खरच पुरूष घेत असेल तर नक्कीच कारवाई होईल, असे आश्वासन तटकरे यांनी दिले.
लाडकी बहीण योजनेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, योजना बंद होणार असे विरोधक सातत्याने बोलत आहेत मात्र, लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, हे मी आजही सांगतो. तसेच लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी कोर्टात कोण गेले? वडपल्लीवार हे नाना पटोले यांचा माणूस होता. ही निवडणूकीपुरती केलेली घोषणा होती असे विरोधकी म्हणाले.
हायकोर्टाने तुम्हाला चपराक दिली. लाडक्या बहिणींनी तुमचा टांगा पलटी केला. लाडकी बहिण योजना कधीही बंद करणार नाही. तसेच नाना पटोल म्हणाले, लाडक्या बहीणींना 2100 रुपये कधी देणार आहात?, आम्ही योग्यवेळी 2100 रुपये देऊ, असे शिंदेंनी यावेळी सांगितले.