मुंबई : वृत्तसंस्था
मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी येथील एका रुग्णालयात पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी मुंबईतील आंदोलनाचा मार्ग व दिशा गुरुवारी जाहीर करण्याची घोषणा केली. मुंबईतील आंदोलनाचा मार्ग कसा असेल हे आम्ही गुरुवारी स्पष्ट करू. आमचा लझढा महाराष्ट्रातील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी आहे. हा लढा आरक्षण मिळेपर्यंत सुरु राहील, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
आम्हाला मुंबईत मारहाण झाली, गोळ्या घातल्या तरी आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असा निर्वाणीचा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी राज्य सरकारला दिला. मुंबईतील आंदोलनाच्या मार्गाची माहिती आम्ही गुरुवारी जाहीर करू. सरकार 20 तारखेच्या आत आरक्षण देणार असेल, तर आम्हाला मुंबईला जाण्याची काही हौस नाही, असेही ते यावेळी म्हणालेत. मराठा व कुणबी एकच असल्याचे लाखो पुरावे सापडलेत. त्यानंतरही आम्हाला त्या क्युरेटिव्ह पिटिशनच्या फुफाट्यात कशाला ढकलत आहात? आम्हाला त्याद्वारे दिले जाणारे आरक्षण टिकणार आहे का? आम्ही ते नाकारले नाही. आम्हाला सर्व मान्य आहे. पण सरकारने ते टिकेल की नाही हे स्पष्ट करावे. ते टिकणारे असेल तर ते आम्हाला मान्य आहे, अन्यथा नाही, असेही मनोज जरांगे यावेळी सरकारला ठणकावत म्हणाले.