अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
जागतिक साक्षरता दिन हा शिक्षण, विज्ञान व सांस्कृतिक विकास याला चालना देऊन शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी विशेष महत्त्वाचा ठरतो. या दिवसाचे औचित्य साधून नागनहळळी येथील आश्रमशाळेत साक्षरता दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव जावेद पटेल हे होते.यावेळी मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून आजच्या युगात साक्षरतेशिवाय सर्वांगीण प्रगती अशक्य
आहे. शिक्षण हेच खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्त्व विकासाचे शस्त्र असून त्याद्वारे समाजातील विषमता दूर करता येते, असे सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. पूजनाचा मान जावेद पटेल व प्राचार्य मुजावर आय.एम. यांना लाभला. साक्षरता दिनानिमित्त शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. निबंध, वक्तृत्व आणि रांगोळी या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. निबंध स्पर्धेत विद्यार्थ्यांनी साक्षरतेचे महत्त्व या विषयावर विचार मांडले तर वक्तृत्व स्पर्धेत ग्रामीण भागातील शिक्षणाची आव्हाने व उपाय यावर भाषणे झाली. रांगोळी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी साक्षरतेवर आधारित आकर्षक कलाकृती साकारल्या.
याप्रसंगी मुख्याध्यापक आर.जी.शेख, सर्व शिक्षकवर्ग तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहन गुरव यांनी करून साक्षरतेचे सामाजिक महत्त्व अधोरेखित केले. आभारप्रदर्शन संजय कवटगी यांनी केले.