मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा हाहाकार सुरु असून अनेक ठिकाणी सत्ताधारी व विरोधक दौरे करीत आहे. यामध्ये भाजप व ठाकरे गटामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले असून आता भाजपने पुन्हा एकदा संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल चढविला आहे.
जनाब संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सकाळी वायफळ बडबड करून भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. मात्र लोकांचा सवाल आहे, हे संजय आहेत की ‘गांज्या’ राऊत? कारण रोज सकाळी त्यांची वागणूक गांजाच्या नशेतल्या माणसासारखी असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने लोकांच्या पाठीशी उभे राहत असताना राऊतांचा राजकारणापुरताच मर्यादित विरोध केवळ नशेतली बडबड ठरत असल्याचे भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी म्हटले आहे.
संजय राऊत यांनी पीएम केअर फंडावर प्रश्न उपस्थित केले. मात्र नवनाथ बन यांनी स्पष्ट केले की, राऊतांनी आधी आपल्या पक्षाची खंडणीखोरीचा हिशोब जनतेसमोर ठेवावा. महाविकास आघाडीच्या काळात रोज 100 कोटींची वसुली होत होती, असा आरोप भाजपने केला. त्यानुसार अडीच वर्षांत तब्बल साडेनऊ लाख कोटींची लूट झाली. तुम्ही मातोश्रीचे खिसे झटकले आहेत. त्यातून किमान 20 हजार कोटी तरी मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना द्या, असा थेट हल्ला भाजपने केला आहे.
पत्रकार परिषदेत बन म्हणाले की, मराठवाड्यातील ओल्या दुष्काळाने आणि पूरस्थितीने जनतेला झळ पोहोचली असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत मराठवाड्यासाठी केंद्राकडून भरीव मदतीची मागणी करण्यात आली असून पंतप्रधानांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
आतापर्यंत राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात थेट अडीच हजार कोटींची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली आहे. चाऱ्याची टंचाई, निवाऱ्याचा प्रश्न, अन्न-पाण्याची सोय, या सर्व बाबींवर महायुती सरकार युद्धपातळीवर काम करत आहे. दिवाळीपूर्वीच सर्व नुकसानग्रस्तांना दुसऱ्या टप्प्यातील मदत पोहोचेल आणि कुठलाही निकष-फॉर्मॅलिटी न लावता शेतकऱ्यांना थेट दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे.
नवनाथ बन यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका करताना म्हटलं की विधानसभेत जनतेने तुम्हाला नाकारलं, आणि देवा भाऊंना आशीर्वाद दिला. जनतेने तुम्हाला शेण खायला लावलं आहे. आजही तुमच्या थोबाडावर जनतेने शेण मारलंय. देवा भाऊंच्या मागे जनता आहे, तुमच्या मागे कोणी नाही, असा उपरोधिक हल्ला करण्यात आला. बन यांनी आठवण करून दिली की कोविडच्या काळात महाराष्ट्रात ऑक्सिजन, बेड, औषधांचा तुटवडा होता. त्यावेळी उद्धव सरकार घरात बसून फक्त कोमट पाणी प्या असं सांगत होतं. दरम्यान, कफनचोरी, खिचडी घोटाळा, टेंडरमधील भ्रष्टाचार, हे सारे प्रकरण जनतेला आठवत आहेत. राऊत आणि आघाडीच्या भ्रष्टाचारामुळेच महाराष्ट्रातील हजारो जीव गेले, असा आरोप भाजपने केला.