अक्कलकोट, दि.२८ : अक्कलकोट तालुक्यात
अति पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित मदत करावी,अशी मागणी अक्कलकोट शिवसेनेच्यावतीने कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
भुसे हे सोलापूरला आले असता शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय देशमुख यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली.त्यावेळी ही मागणी करण्यात आली.सध्या पिकांच्या नुकसानीचा प्रश्न गंभीर आहे.या पार्श्वभूमीवर रब्बी हंगामातील बियाणे आणि खते प्रत्येक गावाला मुबलक स्वरूपात उपलब्ध करून घ्यावेत, सामूहिक शेततळे, नवीन सिमेंट बंधारे करण्यात यावेत, शासनाच्या अनेक प्रकल्पाचे अनुदान रखडलेले आहे ते त्वरित मिळावे, तालुका कृषी कार्यालयासाठी नवीन कृषी कार्यालय व्हावे,कृषी विभागात अनेक पदे रिक्त आहेत ते तातडीने भरण्यात यावे यासह अन्य मागण्या यावेळी करण्यात आल्या.यावेळी शिवसेनेचे सोलापूर शहर प्रमुख गुरूशांत धुत्तरगावकर, प्रताप चव्हाण, गणेश वानकर यांच्यासह तालुका उपप्रमुख सूर्यकांत कडबगावकर, शहरप्रमुख योगेश पवार,प्रवीण घाडगे,वर्षा चव्हाण,वैशाली हवणुर, ताराबाई कुंभार,बसवराज बिराजदार,खंडू कलाल, राहुल चव्हाण यांच्यासह इतर शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.