ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कांजुरमार्गबाबत न्यायालयाच्या आदेशावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया…म्हणाले

मुंबई : सौनिक समितीचा अहवाल अतिशय स्पष्ट आहे. आरे येथे मेट्रो कारडेपो केल्याने पर्यावरणाची कुठलीही हानी होणार नाही. कांजुरमार्ग येथे कारडेपो केल्याने पर्यावरणाची हानी होणार आहे, हे या समितीने आपल्या अहवालात स्पष्ट केले होते. केवळ आणि केवळ सरकारच्या अहंकारासाठी हा निर्णय बदलण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला आरेची जागा दिली आहे. तेथे काम केले तर 2021 पर्यंत आपण मुंबईकरांना मेट्रो देऊ शकतो. त्यामुळे अहंकार सोडून तेथे तत्काळ काम सुरू करावे, आम्ही कोणतीही टीका करणार नाही. काही अधिकार्‍यांना हे लक्षात आले की, मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय अहंकाराने हा निर्णय घेतला आहे. त्याचा फायदा घेऊन त्यांनी मुख्यमंत्र्यांना चुकीचे ब्रिफिंग केले आहे. या निर्णयामुळे मुंबई मेट्रोच्या निर्णयात खरे तर मुख्यमंत्र्यांनीच मिठाचा खडा टाकला. कांजूरला कारशेड नेले तरी आरे येथे काम करावेच लागणार आहे. जर तेथे बांधकाम करायचेच आहे, तर मग आरे येथे कारशेड नाही, हा हट्ट का? असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हा आमच्यासाठी टीकेचा विषय नाही. आरेत काम सुरू करा, विजय आमचा की त्यांचा हे महत्त्वाचे नाही. मुंबईकर जिंकले पाहिजे, ही आमची भूमिका आहे. नवीन लोकांना चांगले भविष्य आहे, त्यांनी थोडे वाचन केले पाहिजे. अभ्यास केला पाहिजे. आपल्याच सरकारने दिलेल्या अहवालाचे वाचन केले पाहिजे. सौनिक समितीने स्पष्ट केले आहे की, 4.5 वर्षाचा विलंब आणि 5000 कोटींचा भूर्दंड हा कांजूरमार्गमुळे होणार आहे. आजच्या निर्णयाने राज्य सरकारला मोठी चपराक बसली आहे. अजूनही वेळ गेली नाही, राज्य सरकारने अहंकार सोडावा! आता सत्य स्वीकारून पुढे गेले पाहिजे,असेही फडणवीस म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!