ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट शहरातील आठवडा बाजार पुन्हा बंद करण्याचे आदेश, जनावरांचा बाजारही राहणार बंद, मुख्याधिकाऱ्यांची माहिती

अक्कलकोट  : जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानुषंगाने अक्कलकोट शहर व तालुक्यातील आठवडी बाजार तसेच जनावरांचा बाजार पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती मुख्याधिकारी सचिन पाटील यांनी दिली आहे.

मध्यंतरी कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने बाजारात रेलचेल वाढली होती. मात्र आता पुन्हा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी नवे आदेश काढून निर्बंध लागू केले आहेत. अक्कलकोटचा बाजार दर सोमवारी असतो.आता या बाजारात अजिबात गर्दी दिसता कामा नये, त्यावरती प्रशासनाचे संपूर्णपणे बारीक लक्ष असेल. याशिवाय जनावरांचा बाजाराकडे देखील प्रशासनाचे लक्ष असणार आहे.

अनेक ठिकाणी ग्रामीण भागातील आठवडी बाजार असतात ते देखील पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार आहेत. सध्या अक्कलकोट शहरामध्ये देखील अनेक ठिकाणी कोरोना चाचणीला वेग आला आहे. विनाकारण रस्त्यावर फिरणार्‍यांची तसेच विना मास्क फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी तातडीने करण्यात येत आहे. जर अहवाल पॉझिटिव आला तर त्याची रवानगी कवॉरंटाईन सेंटरमध्ये करण्यात येत आहे.

कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रत्येकाने वैयक्तिक काळजी घेणे महत्त्वाचे आहे.जर ती प्रत्येकाने आपल्या आरोग्यासाठी घेतली तर निश्चितच चांगले आहे. दरवेळी प्रशासनाला नियम अथवा कायदा आणण्याची वेळ येणार नाही. हा जनतेच्या आरोग्याचा प्रश्न आहे. प्रत्येकाने याचे गांभीर्य ओळखून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी पाटील यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!