नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अयोध्या, त्र्यंबकेश्वर, तिरुवअनंतपूरमसह धार्मिक, ऐतिहासिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या ३० शहरांमध्ये भीक मागण्यास बंदी लागू करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. या शहरांत भीक मागणाऱ्यांचे विशेषत: त्यातील महिला, बालकांचे पुनर्वसन करण्याचा केंद्राचा विचार आहे. त्यादृष्टीने सरकारने या शहरांचे सर्वेक्षणही हाती घेतले आहे.
येत्या दोन वर्षांत ही शहरे भिकारीमुक्त करण्याचा केंद्र सरकारने निर्धार केला आहे. त्या शहरांतले भिकाऱ्यांनी गजबजलेले भाग कोणते हे निश्चित करण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय संबंधित जिल्हे, महापालिकांना मदत करणार आहे. भिकारीमुक्त करण्याच्या शहरांच्या यादीत आणखी काही नावांचा समावेश होण्याची शक्यता आहे.