नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार काल बुधवारी राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये पार पडला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सर्व ४३ मंत्र्याना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यामध्ये महाराष्ट्रातून नारायण राणे यांना प्रथम स्थान देण्यात आले होते. नारायण राणे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर शिवसेनेला शह देण्यासाठी ही भाजपची खेळी असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगले आहेत. तर दुसरीकडे भाजपचे नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची कन्या खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने भाजप नेत्या पंकजा मुंडे हे नाराज असल्याचे बोलले जात आहे. यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क वर्तविले जात आहेत. या सर्व चर्चांवर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागलेल्या नारायण राणे यांना त्यांचा क्षमता पाहून मंत्रिपद दिले असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी दिली आहे. नाशिक येथे महापालिकेच्या सिटीलींक शहर बस सेवेचे उद्घाटन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यांनतर पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली.
राज्यात शिवसेनेला डिवचल्याच फळ नारायण राणे यांना मिळत असल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात उमटू लागल्यानंतर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या आरोपांचे खंडन केले आहे. नारायण राणे यांना यांची क्षमता पाहून मंत्रिपद मिळाले असल्याची प्रतिक्रिया फडणीस यांनी नाशिकमध्ये दिली आहे.
मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची भगिनी प्रीतम मुंडे यांना स्थान न दिल्याने पंकजा मुंडे नाराज असल्याचे बोलले जात आहे. तसेच मंत्रिमंडळ विस्तारानंतर मुंडे भगिनींनी कोणत्याही नेत्यांचे अभिनंदन करणेही टाळले आहेत. यामुळे या चर्चांना आणखीन हवा मिळाली आहे. यासंदर्भात माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांना प्रश्न विचारला असता या चर्चा स्पष्टपणे नाकारली. फडणवीस म्हणाले की, “तुम्हाला कुणी सांगितलं त्या नाराज आहेत” कृपा करून त्यांना बदनाम करु नका. भाजपामध्ये आमचे सर्वोच्च नेते निर्णय घेत असतात. कारण कोणतीही नाराजी नसताना त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.