दुधनीत कलबुर्गी-कोल्हापूर आणि हुसेनसागर एक्स्प्रेसला थांबा देण्याची मागणी
नगराध्यक्ष म्हेत्रे यांनी दिले खासदार
माने व वाघमारे यांना निवेदन
अक्कलकोट, दि.२८ : अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथे कलबुर्गी-कोल्हापूर एक्स्प्रेस आणि हुसेनसागर मुंबई एक्स्प्रेस यांना थांबा मिळावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. याबाबत नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे व समस्त शिवसैनिकांनी खासदार धैर्यशील माने आणि खासदार ज्योती वाघमारे यांना निवेदन देऊन दुधनीत या दोन्ही गाड्यांना थांबा देण्याची मागणी केली. यावेळी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे,सिद्धाराम येगदी,रामा गद्दी यांच्यासह दुधनी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुधनी हे मोठ्या बाजारपेठेचे गाव असून या ठिकाणी रेल्वे स्टेशनही उपलब्ध आहे. मात्र, सध्याच्या घडीला महत्त्वाच्या दोन गाड्यांचा थांबा नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. विशेषतः विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी आणि नियमित प्रवाशांसाठी या गाड्या अत्यंत उपयुक्त ठरू शकतात, असे निवेदनात नमूद करण्यात आले.
दुधनीसारख्या वर्दळीच्या आणि व्यापारी
महत्त्व असलेल्या ठिकाणी या गाड्यांचा थांबा मिळाल्यास परिसरातील नागरिकांना थेट मोठा दिलासा मिळेल. सध्या या गाड्यांसाठी इतर स्थानकांवर जावे लागत असल्याने वेळ, पैसा आणि श्रम यांचा अनावश्यक खर्च होत आहे. त्यामुळे दुधनीतील नागरिकांनी या मागणीला व्यापक पाठिंबा दर्शविला आहे.
स्थानिक जनतेच्या दृष्टीने ही मागणी अत्यंत रास्त आणि गरजेची असल्याचे मत नगराध्यक्ष म्हेत्रे यांनी व्यक्त केले. खासदारांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दुधनीच्या विकासाच्या दृष्टीनेही या दोन एक्स्प्रेसचा थांबा मिळणे महत्त्वाचे ठरेल, असेही सांगण्यात आले.










