वाढत्या महागाई विरोधात नागपुरात सायकल रॅली,काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर चढवला हल्लाबोल
नागपूर : पेट्रोल, डिझेल, गॅस व जीवनावश्यक वस्तूंचे किमती भरमसाठ वाढल्याने सर्व प्रकारच्या महागाई वाढली असून लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे. सरकारचे अपयश झाकण्यासाठी चेहरे बदलून चालणार नाही. तर पंतप्रधानच बदलण्याची गरज आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपुरात केली.
इंधन दरवाढ व महागाईविरोधात काँग्रेसने राज्यातील सर्व महसुली आयुक्त मुख्यालयाच्या ठिकाणी सायकल रॅली काढून मोदी सरकारचा निषेध केला. नागपुरात क्रीडा मंत्री सुनील केदार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली भर पावसात सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी नाना पटोले यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली. केंद्रातील फक्त मंत्री नव्हे तर पंतप्रधानच बदलण्याची गरज असल्याची टीका पटोले यांनी यावेळी केली.
केंद्रातील मोदी सरकारने कृत्रिम महागाई निर्माण करून सामान्य जनतेला आर्थिक दृष्ट्या कमकुवत केले आहे. या सामान्य माणसाच्या वेदना दिल्लीच्या सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच सामान्य जनतेच्या हक्कासाठी काँग्रेस पक्ष मोदी सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहे, असे नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.