सोलापूर : युती सरकारच्या पाच वर्षाच्या काळात शेतकर्यांचे एकदाही वीज कनेक्शन कट केले नव्हते. मात्र महाविकास आघाडीने सत्तेवर आल्यापासून शेतकर्यांना त्रास देणे सुरू केले आहे. आता तर दादागिरी करत साखर कारखान्यांना पत्र देऊन ऊस उत्पादक शेतकर्यांचे वीजबिल उसाच्या बिलातून कट करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पठाणी वसुली सुरू आहे. ऊर्जामंत्र्यांकडून जर विज बिलाचा प्रश्न सुटत नसेल आणि त्यांचे अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री एकेत नसतील तर त्यांनी राजीनामा देऊन शेतकर्यांच्या आंदोलनात सहभागी व्हावे, असे अशा शब्दात आपला आ. सुभाष देशमुख यांनी आपला संताप व्यक्त केला.
शेतकर्यांचे थकित वीजबिल उसदरातून वसूल करण्यात येत आहे यासह शेतकर्यांच्या विविध प्रश्नांसाठी सोमवारी भाजपच्या वतीने आ. सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जुनी मिल येथील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी आ. देशमुख आणि कार्यकर्त्यांनी महाआघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
ऊस बिलातून लाईटबिल कपात करण्यात येऊ नये, दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्यातील सर्व गावांचा सौर ऊर्जेच्या यादीत समावेश करावा, ग्रामपंचायतीना 15 व्या वित्त आयोगातून पाणीपुरवठा, वीजबिल भरण्याची सक्ती करून ये, सिंगल फेज डीपी वरील बर्याच ठिकाणी तीन पैकी एकच चिमणी (डब्या) आहे. उर्वरित चिमण्या तात्काळ बसवाव्या, नवीन शेतीपंपा कनेक्शनच्या अडचणी सोडवाव्यात, बर्याच वाड्या-वस्त्यांवर सिंगल फेजची अद्याप व्यवस्था नाही नवीन सिंगल फेज योजनाकार्यान्वीत करावी, अनधिकृत वीज कनेक्शन जोडणी भरपूर प्रमाणात आहे यावर आळा घालाव, घरगुती व व्यावसायिकांना कोरोना काळात विज कमी प्रमाणात वापरली असून देखील बिले भरमसाठ आलेली आहेत ती बिले दुरुस्ती करून द्यावीत यासह विविध मागण्या आ. देशमुख यांनी यावेळी केल्या.
या मोर्चामध्ये दक्षिणचे तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, जिल्हा परिषद पक्षनेते अण्णाराव बाराचारे, नगरसेविका संगीता जाधव, मेनका राठोड, उपमहापौर राजेश काळे, अंबिका पाटील, गौरीशंकर मेंडगुडले, मळसिद्ध मुगळे, अर्चना वडणाल, सोनाली कडते, श्रीनिवास करली, सोमनाथ केंगनाळकर, हनुमंत कुलकर्णी यांच्यासह भाजपाचे दाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.






