अक्कलकोट येथे २७ व २८ रोजी गो आधारित सेंद्रिय शेती प्रशिक्षणाचे आयोजन, गोपालकांना मिळणार तज्ञांकडून मार्गदर्शन
अक्कलकोट, दि.२१ : अक्कलकोटमध्ये येत्या २७ आणि २८ नोव्हेंबर रोजी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी गो आधारित सेंद्रिय शेती प्रशिक्षणाचे आयोजन केल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे. श्री स्वामी समर्थ देवस्थान, अन्नछत्र मंडळ व विवेकानंद प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मैंदर्गी रोड वरील इंगळे पॉलीटेक्निक कॉलेजमध्ये सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे प्रशिक्षण सर्व चालणार आहे. या कार्यक्रमाला अहमदाबाद येथील प्रसिद्ध बन्सी गिर गो शाळेचे संचालक गोपालभाई सुतारीया मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी,
वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
गोपालभाई सुतारीया यांनी बन्सी गीर गोशोळेची २००६ साली सुरुवात केली. आज गो शाळेत ७०० गीर गायीचे अतिशय चांगल्या रितीने जोपासना केली जाते. भारतीय देशी गोमाता व आयुर्वेदाची सांगड घालून गोविज्ञानाची नविन परिभाषा बन्सी गीर गोशाळेद्वारे त्यांनी मांडली आहे.
गोशाळेद्वारे गो चिकित्सा पद्धती विकसित करण्यात आली आहे.तसेच त्यांनी देशी गायीच्या पंचगव्यापासून अथक परिश्रमाद्वारे गोकृपाअमृत हे दिव्य जीवाणू कल्चर विकसित केले व त्याचे व्यापारी तत्वावर न वितरण करता देशी गायीचे संगोपन व्हावे म्हणून पूर्ण भारत भर निशुल्क गोकृपाअमृत शेतकऱ्यांपर्यंत पोचवले. भारतातील अनेक राज्यातील शेतकरी गोकृपाअमृत कल्चरचा वापर आपल्या शेतात सतत वापरत आहेत.अनेक आश्चर्य कारक परिणाम गोकृपाअमृत द्वारे मिळत आहेत.
गोकृपाअमृतमध्ये ६२ जिवाणू आहेत. भारतीय देशी गायीचे शेण व गोकृपाअमृत यांचा वापर करुन विषमुक्त गोआधारीत शेती यशस्वीपणे करु शकतो, हे सिद्ध केले आहे. याचा प्रचार व प्रसार गोपालभाई व अनेक स्वंयसेवक भारतभर करत आहेत.
या पार्श्वभूमीवर दोन दिवसीय गोआधारित सेंद्रिय शेती प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे.या कार्यक्रमास महाराष्ट्र व कर्नाटकातील कानाकोपऱ्यातील गोसेवक शेतकरी उपस्थित राहणार आहेत.तरी अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांनी
या सुवर्ण संधीचा लाभ अवश्य घ्यावा,असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात
आले आहे.