मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खानसह इतरांना एनसीबीने क्रूझवर छापा टाकत अटक केली होती. मात्र चौकशीदरम्यान आर्यन खानकडे कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज आढळून आलेले नाही. न्यायालयाने देखील आर्यनकडे चौकशी दरम्यान कोणत्याही प्रकारेच पुरावे मिळाले नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता या प्रकरणी एनसीबी आरोपीच्या पिंजऱ्यात उभी राहणार असल्याची चर्चा आहे. मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.
समीर वानखेडे यांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असेल तर, त्यांनाच चौकशीच्या फेऱ्यात ओढण्याची तयारी राज्य सरकार करतंय का, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. वानखेडेंवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. त्यामध्ये राज्य सरकारने एसआयटी स्थापन केली आहे. यामुळे राज्य सरकार विरुद्ध केंद्रीय यंत्रणा यांच्यातील वाद पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे.
एनसीबी मुंबईचे संचालक समीर वानखेडे आर्यन खान प्रकरणावरून वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे गेल्या काही दिवसांपासून समीर वानखेडेंवर टीका करत त्यांच्यावर वेगवेगळे आरोप लावत आहेत. आर्यनच्या चौकशीदरम्यान कोणतेही पुरावे मिळाले नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
त्यानंतर आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लेख करत या प्रकरणाची चौकशी करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. न्यायालयाने क्लिन चीट दिली असून, ही चौकशी का करण्यात आली? या प्रकरणाची चौकशी व्हायलाच पाहिजे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचे देखील वळसे म्हणाले.