ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राजा माने यांना सुधारककार आगरकर राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

 

 

मुंबई : सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांच्या १६६ व्या जयंती निमित्त कराड येथील इंद्रधनु विचारमंच फाउंडेशनच्यावतीने या वर्षीपासून प्रथमच विविध माध्यम प्रकारातील योगदानाबद्दल राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार दिले जात आहेत. ज्येष्ठ संपादक राजा माने यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. सुधारककारांच्या टेंभू,ता. कराड,जि.सातारा या जन्मगावी गुरुवार दि १४ जुलै रोजी सकाळी १० वाजता पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. या सोहळ्यात महाराष्ट्रातील ६ पत्रकारांना पुरस्कार सन्मानित करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे,जिल्हाधिकारी शेखर सिंह, सातारा जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बंन्सल, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे उपस्थित राहणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान टेंभू गावचे लोकनियुक्त सरपंच युवराज भोईटे भूषविणार आहेत. यावेळी कराडचे प्रांताधिकारी उत्तम दिघे, कराड उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.रणजीत पाटील, तहसिलदार विजय पवार ,उद्योजक रामकृष्ण वेताळ, पत्रकार संघाचे सातारा शहर अध्यक्ष विनोद कुलकर्णी आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.
सन २०२२ चा गोपाळ गणेश आगरकर सुधारक पुरस्कार सोलापूर येथील ज्येष्ठ संपादक राजा माने,सातारा येथील दैनिक ग्रामोध्दारचे संपादक बापूसाहेब जाधव,दैनिक सकाळ पुणे उपसंपादक आशिष तागडे, सिंधुदुर्ग लाईव्हचे कार्यकारी संपादक अर्जुन धस्के,झी २४ तास चॅनलचे सातारा जिल्हा प्रतिनिधी तुषार तपासे,दैनिक पुढारी कोल्हापूरच्या स्नेहा मांगुरकर यांना प्रदान करण्यात येणार आहेमहाराष्ट्रातील विचारवंत, समाजसुधारक,पत्रकार व शिक्षणतज्ज्ञ गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कराड तालुक्यातील टेंभू येथे १४ जुलै १८५६ साली अत्यंत सामान्य कुटुंबात झाला.आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात सामाजिक जागृतीत आगरकरांचे योगदान मोलाचे आहे. त्यांनी समाज प्रबोधन करण्यासाठी सुधारक, केसरी व मराठा या वृत्तपत्रांचा आधार घेतला. सामाजिक समता, स्त्री-पुरुष समानता आणि विज्ञान‌-निष्ठा‌ ही त्यांची जीवनमूल्ये होती. मुलींनासुद्धा शिक्षण मिळायला पाहिजे असा लेख त्यांनी सुधारक या वृत्तपत्रात लिहिला.
बुद्धिप्रामाण्य वादाचे पुरस्कार करून महाराष्ट्रामध्ये समाज सुधारणा घडून आणणे या उद्देशाने समाजसुधारणा करणाऱ्या समाजसुधारकांमध्ये गोपाळ गणेश आगरकर यांचा समावेश होतो. महाराष्ट्रातील समाज सुधारकांच्या मांदियाळीतील क्रांतीकारी समाजसुधारक म्हणून आगरकर हे महत्त्वपूर्ण ठरतात.सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांची कर्मभूमी असलेल्या टेंभू येथील पत्रकारांच्या पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहावे,असे आवाहन इंद्रधनु विचारमंच फाउंडेशनचे विश्वस्त विकास भोसले,नितीन ढापरे ,संदीप चेणगे, प्रमोद तोडकर, अशोक मोहने, माणिक डोंगरे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!