मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील ठाकरे गटाचे नेते शिवसेना – भाजप युती तुटल्यापासून भाजपच्या नेत्यांवर नेहमीच टीका करीत असतात दिसून येत आहे. नुकतेच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी थेट भाजपवर टीका केली आहे. आम्ही 25 वर्षे मोदींच्या प्रेमात होतो. पण फसणूकीतून शेवटी आमचा प्रेमभंग झाला असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे. तसेच बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यास भाजपला भीती का वाटते? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच हे मोदींचे राज्य नसून ईव्हीएमच्या माध्यमातून लढवलेले हुकूमशाहीचे राज्य आहे अशी टीकाही राऊतांनी केली. प्रसार माध्यमांशी बोलताना राऊतांनी अनेक विषयांवर भाष्य केले.
राऊत म्हणाले,”शिंदे दीड वर्षांपासून मोदींच्या प्रेमात आहेत. मात्र आम्ही 25 वर्षे त्यांच्या प्रेमात होतो. फसवणुकीतून आमचा प्रेमभंग झाला आहे. काल परवा आले आणि प्रेमात पडले. हे प्रेम टिकत नाही. सत्ता असेपर्यंत हे प्रेम टिकेल. हे प्रेम नव्हे तर सत्ता आणि ईडीडची भीती बोलत आहे”, असा घणाघात राऊतांनी केला.
संजय राऊत म्हणाले, ”ईव्हीएम विषयी जनता रस्त्यावर आली तर त्याला सरकार जबाबदार ठरेल. देशात सर्वात मोठी बेईमान लोकशाही ही सध्या पाहायला मिळत आहे. ज्या लोकशाहीवर जनतेवर विश्वास नाही ती पद्धत चालवून कोणत्या प्रकारची लोकशाही चालवली जात आहे? भाजपचे लोक मोदींना विष्णूचे १३ वे अवतार मानतात. मग कागदावर निवडणूका घ्यायला का घाबरतात?”, असे राऊतांनी म्हंटले आहे. तसेच बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर ३३ कोटी देव आणि रामलल्लाही भाजपला वाचवणार नाहीत. भाजपला साधी ग्रामपंचायत आणि महानगरपालिकाही जिंकता येणार नाही असा हल्लाबोल राऊतांनी केला आहे.