मुंबई : वृत्तसंस्था
शतकानुशतके वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आज दि.२२ जानेवारी सोमवार रोजी अखेर रामलल्ला अयोध्येत विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराच्या गर्भगृहात राम लल्लाचा अभिषेक आणि प्रार्थना केली. श्रीराम अयोध्येत आले… देशवासियांनी रामलल्लाचे दर्शन घेतले. या सर्वांत देशभरात कारसेवकांची आठवण काढली जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील कारसेवकांची आठवण करत, त्यांचे आत्मे सुखावले असल्याची भावना व्यक्त केली आहे. इतकेच नाही तर 32 वर्षांनी शरयू नदी हसली असल्याचेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
सुमारे 500 वर्षांपासून मंदिर बांधण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक रामभक्ताची इच्छा पूर्ण झाली आहे. मंदिर उभारणीचा प्रवास खूप मोठा आहे. यामध्ये अनेक रामभक्तांनी बलिदान दिले आहे. अनेकांनी सर्वस्वाचा त्याग केला आहे. भगवान श्री रामाच्या भव्य राम मंदिराच्या उभारणीसाठी चळवळीचा मोठा इतिहास आहे. चळवळीशी संबंधित अनेक पुरावे काळाच्या ओघात गमावले गेले तर काही अजून बाकी आहेत. या सर्वांची आठवण आज रामभक्तांना येत आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलेल्या पोष्टमध्ये रामलल्लाच्या पहिल्या दर्शनाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्या सोबतच राज ठाकरे यांनी म्हटले की, ‘आज कारसेवकांचे आत्मे सुखावले आणि 32 वर्षांनी शरयू नदी हसली !’ या वाक्यासोबतच राज ठाकरे यांनी ‘जय श्रीराम’ म्हणत सर्वांच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.