मुंबई: महाराष्ट्राचं राजकारणात सध्या शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन तापलं आहे. औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर करण्यासाठी शिवसेना आतापर्यंत आग्रही राहिली आहे. अशावेळी शिवसेनेसाठी एक महत्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. मुंबई सेंट्रल टर्मिनसचं नाव बदलण्याची मागणी शिवसेनेकडून सातत्यानं करण्यात येत होती. त्यावर आता केंद्र सरकारनं कार्यवाही सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे.
त्यामुळे आता लवकरच मुंबई सेंट्रल टर्मिनसचं नाव ‘नाना शंकर शेठ’ टर्मिनस होण्याची चिन्ह आहेत. तसं पत्रच केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांना पाठवलं आहे. दरम्यान, ठाकरे सरकारने मुंबई सेंट्रल टर्मिनसचे ‘नाना शंकरशेठ टर्मिनस’ स्टेशन असे नामकरण करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारने शिक्कामोर्तब केल्यानंतर हे नाव प्रत्यक्षात येईल.
मुंबई सेंट्रल टर्मिनस रेल्वेस्थानकाचे नामकरण 'नाना शंकर शेठ" टर्मिनस करण्याच्या विनंतीसंदर्भात सन्मा. केंद्रीय गृह राज्य मंत्री श्री. नित्यानन्द राय @nityanandraibjp यांचे सकारात्मक उत्तर…!@OfficeofUT @AUThackeray @ShivsenaComms pic.twitter.com/PHMCjxupBO
— Arvind Sawant (@AGSawant) January 4, 2021
मुंबई सेंट्रल टर्मिनसला नाना शंकरशेट यांचं नाव देण्याची मागणी फार जुनी आहे. त्याला आधीच फार विलंब झाला आहे. याबाबत राज्य सरकारने विधिमंडळात प्रस्ताव मंजूर केल्यानंतर केंद्र सरकारकडून विलंब होण्याचं कोणतंही कारण नाही, असं अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात सावंत यांनी केंद्रीय गृह राज्य मंत्री नित्यानंद राय यांना पत्र लिहिलं होतं. पत्राला नित्यानंद राय यांनी उत्तर दिलं असून नामांतराला सकारात्मक उत्तर आल्याचं अरविंद सावंत म्हणाले. केंद्र सरकार कडून याबाबत प्रक्रिया सुरु असल्याची माहिती केंद्रीय गृह राज्य मंत्र्यांनी दिल्याने लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण होईल व नाना शंकरशेट यांचे नाव मुंबई सेंट्रल टर्मिनसला मिळेल, अशी आशा अरविंद सावंत यांनी व्यक्त केली.






