मुंबई | राज्यात सध्या औरंगाबाद शहराच्या नामांतरावरुन राजकीय वातावरण तापलं असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय कार्यालयाच्या (CMO) अधिकृत ट्विटर अकाउंटवर औरंगाबाद शहराचा संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला आहे. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो, याचे भान बाळगावे,’ अशी संतप्त प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या नामांतराचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून ऐरणीवर आला आहे. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये या मुद्द्यावरून मतभेद आहेत. शिवसेना नामांतराबद्दल आग्रही आहे तर, काँग्रेसचा त्यास विरोध आहे. ही संधी साधून भाजपनं हा मुद्दा लावून धरला आहे. त्यातच मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर अकाउंटवरून राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती देताना औरंगाबादचा उल्लेख ‘संभाजीनगर’ करण्यात आल्यामुळं काँग्रेस कमालीची संतप्त झाली आहे. बाळासाहेब थोरात यांनी तात्काळ ट्वीट करून नाराजी बोलून दाखवली आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने शहरांचे परस्पर नामांतरण करू नये, सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो, याचे भान बाळगावे. शहरांचे नामांतरण करणे हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही.असं बाळासाहेब थोरात यांनी ठणकावून सांगितलं आहे.
महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते. भारतीय राज्यघटनेची मूलतत्त्वे हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे. आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो, सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे”, अशी भूमिका थोरात यांनी मांडली आहे.
छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे. त्यांच्या नावाचा वापर करून नामांतराचे राजकारण खेळू नये, आपण सर्व मिळून औरंगाबादच्या विकासासाठी काम करूया. अशा शब्दात बाळासाहेब थोरात यांनी ही नाराजी व्यक्त केली आहे.






