---Advertisement---

कांगारुंची घमेंड उतरवली, बॉर्डर-गावस्कर मालिकेत टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय!

On: January 19, 2021 1:39 PM
Follow Us:
---Advertisement---

ब्रिस्बेन : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियात इतिहास घडवला. भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ यांच्यात खेळल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला आहे. ब्रिस्बेनमधील गाबा मैदानात खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात दिलेल्या ३२८ धावांचा पाठलाग करत भारताने ३ गाडी राखत विजय मिळवला आहे. दुसऱ्या डावात शुभमन गिल (91) आणि रिषभ पंत (89*) यांच्या जिगरबाज खेळीने भारताचा हा विजय साकारला आहे. भारताने ही मालिका २-१ अशी जिंकली आणि बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कायम राखली.

 

पाचव्या आणि अखेरच्या दिवशी भारताने कालच्या ४ धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरूवात केली. टीम इंडियाला विजयासाठी ३२८ धावांची गरज होती. रोहित शर्मा आणि शुभमन गिल मैदानात होते. पॅट कमिन्सने रोहित शर्माला ७ धावांवर बाद करत भारताला पहिला धक्का दिला. त्यानंतर चेतेश्वर पुजार आणि गिल यांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागिदारी केली. या दोघांनी ११८ धावा केल्या. पुजाराने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना संधी दिली नाही. तर गिलने धावा काढण्याची संधी सोडली नाही. गिल कसोटीतील पहिले शतक झळकावेल असे वाटत असताना नॅथन लायनने त्याला ९१ धावांवर बाद केले.

 

गिलच्या जागी आलेल्या कर्णधार अजिंक्य रहाणेने भारतीय संघ विजयासाठी खेळणार असल्याचा मेसेज ऑस्ट्रेलियाला दिला. पुजारा सोबत त्याने धावांचा वेग वाढवला. पण त्या प्रयत्नात रहाणे बाद झाला. त्याने २२ चेंडूत १ चौकार आणि १ षटकारासह २४ धावा केल्या. रहाणे बाद झाल्यानंतर मयांक अग्रवालच्या जागी ऋषभ पंत फलंदाजीसाठी आला. भारताच्या या फलंदाजीतील बदलावरून संघ विजयासाठी मैदानात उतरला आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. पंतने पुजारा सोबत ६१ धावांची भागिदारी केली.

 

ऑस्ट्रेलियाने नवा चेंडू घेतल्यानंतर कमिन्सने पुजाराला ५६ धावांवर बाद केले. पुजाराने कसोटी करिअरमधील सर्वात धीम्या गतीने केलेले हे अर्धशतक ठरले. त्याने ५० धावा करण्यासाठी १९६ चेंडू घेतले. पुजाराच्या जागी आलेल्या मयांक अग्रवालने पंतसह पाचव्या विकेटसाठी ३७ धावांची भागिदारी केली. कमिन्सने अग्रवालला ९ धावांवर बाद करत भारताला पाचवा धक्का दिला. त्यानंतर रिषभ व वॉशिंग्टन सुंदर यांनी खिंड लढवत सामना जिंकला. या जोडीनं सहाव्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी केली. भारतानं ही मालिका २-१ अशी जिंकून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी आपल्याकडे कायम राखली. टीम इंडियानं गॅबा कसोटी जिंकून बॉर्डर-गावस्कर चषक ( Border–Gavaskar Trophy) सलग तिसऱ्यांदा आपल्याकडे ठेवला. २०१७ (भारत) आणि २०१८-१९ मध्ये भारतानं २-१ अशी मालिका जिंकली होती. २०२०-२१मध्ये मालिका १-१अशी बरोबरीत सोडवून बॉर्डर-गावस्कर चषक स्वतःकडे ठेवला

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!