मुंबई : नाना पटोले यांच्याकडे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आल्यानंतर मावळते प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी त्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पटोले यांचे अभिनंदन करतानाच थोरात यांनी काही अपेक्षाही व्यक्त केल्या आहेत.
सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. अनंत अडचणी असतानाही महाराष्ट्रातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते भक्कमपणे माझ्या सोबत उभे राहिले. आम्ही धर्मांध जातीयवादी शक्तींविरोधात एकजुटीने आणि निकराने लढाई लढलो. महाराष्ट्रात सत्तेत आल्यानंतर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी पक्षाने नव्या व्यक्तीकडे द्यावी, ही अपेक्षा मी सातत्याने अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडे व्यक्त करत होतो, काँग्रेसचे कार्य अधिक चांगले व्हावे ही माझी अपेक्षा आहे.
आता तो निर्णय झाला आहे, गेल्या दीड वर्षात काँग्रेस कार्यकर्त्यांनी मला विलक्षण प्रेम दिले. रात्रीचा दिवस करून अनेक पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मोलाची साथ दिली त्या सर्वांचे मी आभार मानतो’, असे थोरात म्हणाले. राज्यातील पक्ष संघटनेचे नवे शिलेदार काँग्रेसचा विचार आणि संघटन बळकट करण्यासाठी पूर्ण वेळ आणि गतीने कार्यरत राहतील. सरकार आणि संघटना दोन्ही पातळीवर काँग्रेस जनतेचा आवाज बनून काम करेल, याचा मला पूर्ण विश्वास आहे, असेही थोरात यांनी पुढे नमूद केले.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीआधी बाळासाहेब थोरात यांच्याकडे महाराष्ट्र काँग्रेसची धुरा देण्यात आली होती. काँग्रेससाठी तेव्हाची स्थिती फारच आव्हानात्मक होती. पक्षातही बरीच मरगळ आलेली होती. त्या स्थितीतही थोरात यांनी सर्वांना सोबत घेऊन चांगले नेतृत्व दिले. त्याचा परिणाम म्हणून विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षेपेक्षा चांगले यश मिळाले. विशेष म्हणजे सत्तेच्या फ्रेममध्ये काँग्रेस पक्ष कुणालाच दिसत नव्हता. असे असताना राजकीय उलथापालथ होऊन आज काँग्रेस राज्यातील सत्तेत तिसरा वाटेकरी आहे. म्हणूनच थोरात यांचे नेतृत्व ठसा उमटवणारे ठरले. आता या जबाबदारीतून मुक्त होत असताना निष्ठावंत थोरात यांनी नव्या टीमला पक्षाच्या उज्ज्वल भविष्यासाठी काही ठळक सूचना केल्या आहेत.