गुरुराज माशाळ
दुधनी,दि.२३ : महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने कर्नाटक सरकार सतर्क झाले आहे. दुधनीपासुन जवळ महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेल्या सिन्नुर गावाजवळील कर्नाटकच्या हद्दीत बळुर्गी गावाच्या सीमेवर कर्नाटक सरकारकडुन चेक पोस्ट उभारण्यात आले आहे. या चेकपोस्टवर महाराष्ट्रातून कर्नाटकात जाण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक वाहनातील प्रत्येक व्यक्तीची कसून चौकशी केली जात आहे.
अक्कलकोट- गाणागापुर महामार्गावर कर्नाटक सरकारकडून वाहनातील प्रत्येक प्रवाशाकडून कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट मागितले जात आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर टेस्टचा निगेटिव्ह रिपोर्ट घेवून येणे आवश्यक आहे. ही टेस्ट ७२ तास अगोदर केलेली असली पाहिजे. कलबुर्गी जिल्ह्यातील अफझलपुर तालुक्यातील बळूर्गी आणि माशाळ तर आळंद तालुक्यातील निंबाळ, हिरोळी, खजुर्गी गावाजवळ चेक पोस्ट सुरू
करण्यात आले आहे. यामुळे महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये जाणाऱ्या प्रावाशाना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
काल आणि परवा महाराष्ट्रातून कर्नाटकात गेलेल्या वाहनांना आज महाराष्ट्रात विना चौकशी सोडले जात आहे. तर आजपासुन महाराष्ट्रातुन कर्नाटक राज्यात जाणाऱ्यांना मात्र कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असल्याशिवाय प्रवेश नाकारले जात आहे. कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह नसल्यास त्यांना परत महाराष्ट्रात पाठविले जात आहे. राज्यातील अनेक प्रवाशी तिर्थक्षेत्र अक्कलकोट येथील प्रसिद्ध स्वामी समर्थांचे दर्शन घेवुन कर्नाटकातील गाणगापुर येथील दत्त मंदिरात जावुन दत्त महारांजांचे दर्शनसाठी जातात मात्र ऐनवेळी कर्नाटक सरकारने कडक अमलबजावणी सुरु केल्याने महाराष्ट्रातुन कर्नाटकात जाणार्या नागरिकांचे मोठे हाल
होत आहेत.अचानक कर्नाटक सरकारने कोरोनाचे नियम कडक केल्याने या ठिकाणी प्रशासन आणि प्रवाशांमध्ये वाद देखील बघायला मिळत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपुरसह राज्यातील अन्य जिल्ह्यातुन आलेल्या प्रवाशांमधुन तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.