सोलापूर,दि.1 : मनरेगाच्या माध्यमाद्वारे गावात रोजगार निर्मितीसोबतच विविध विकास कामे होण्यास मदत होते. शेती पूरक व्यवसाय, शेती उत्पादने विक्री व्यवस्था, आत्मनिर्भर योजना, उज्वला योजनेसह गावातील पर्यटन स्थळाचे मार्केटिंग करण्यास सोलापूर सोशल फौंडेशन कार्य करीत आहे. यासाठी सर्वांनी एकसंघ प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यातूनच तालुक्याचा विकास होतो, असे प्रतिपाद आ. सुभाष देशमुख यांनी केले.
आत्मनिर्भर ग्राम अभियानांतर्गत दक्षिण सोलापूर येथील सरपंच व स्वयंसेवकांचा कार्यक्रम घेण्यात आला, त्यावेळी अध्यक्षस्थानावरून आ. देशमुख बोलत होते. यावेळी प्रभारी जिल्हा कृषी अधिकारी रवींद्र माने, माळकवठे येथील शेतकरी उत्पादक कंपनीचे मुख्य हणमंत कुलकर्णी, धीरज छपेपकर उपस्थित होते.
यावेळी कृषि अधिकारी माने म्हणाले, कोरोनामुळे सर्वच आर्थिक क्षेत्रांवर परीणाम झाला असूनही शेतकरी मात्र थांबला नाही. त्यामुळे शेतमालाला भविष्यात खूप मागणी राहणार आहे. तसेच सामूहिक शेतीला वाव असून शेतकरी गट स्थापन करून त्याद्वारे शेती केली गेली पाहिजे. यावेळी दक्षिण तालुक्यातील विविध गावाचे सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.