मुंबई: संपूर्ण राज्यात गाजलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राज्याचे वनमंत्री शिवसेना नेते संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा लागला. हा राजीनामा फक्त दिखाव्यासाठी घेतला गेला, राज्यपालांकडे तो पाठविनाय्त आलेला नाही असे आरोप विरोधकांनी केले होते. याबाबत विधानसभेतही पडसाद उमटले होते. त्यानंतर सूत्रे वेगाने हलली असून राठोड यांच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केली आहे व हा राजीनामा मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतल्याशिवाय अधिवेशन चालू देणार नाही अशी भूमिका भाजपसह विरोधी पक्षांनी घेतली होती. त्यानंतर संजय राठोड यांनी राजीनामा दिला.
परळी वैजनाथ येथील तरुणी पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येचं प्रकरण सध्या राज्यात गाजत आहे. पुण्यातील वानवडी भागात इमारतीतून उडी घेऊन ८ फेब्रुवारी रोजी पूजाने आत्महत्या केली होती. त्यानंतर काही ऑडिओ क्लिप्स समोर आल्याने व त्यात संजय राठोड यांचा आवाज असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात आल्याने या प्रकरणाला गंभीर वळण लागलं होतं. पूजाच्या मृत्यूला संजय राठोड जबाबदार आहेत असा थेट आरोप करत भाजपच्या महिला आघाडीने कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर राठोड यांचा राजीनामा न घेतल्यास अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला तोंड उघडू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा भाजपने घेतला होता. त्यासाठी राज्यभरात आंदोलन करण्यात आले.