अक्कलकोट, दि.२० : अक्कलकोट तालुक्यातील तीन नगरपालिका आणि २८ गावातील संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता कुरनूर धरणातून येत्या गुरुवारी पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे. गुरुवारी, सकाळी १० वाजता धरणातून पाणी सोडले जाईल.यानंतर धरणाखालील आठ कोल्हापुरी बंधारे अडीच मीटरने भरून घेतले जातील,अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.फेब्रुवारी महिन्यात कुरनूर धरण कालवा सल्लागार समितीची बैठक झाली होती.त्यावेळी धरणातून दोन वेळा पाणी सोडण्याचा निर्णय झाला होता.पहिल्या टप्प्यातील पाणी सोडण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.आता केवळ पिण्यासाठी पाणी म्हणून ही दुसऱ्या टप्प्यातील प्रक्रिया गुरुवारी पूर्ण करण्यात येईल.सध्या कुरनूर धरणांमध्ये ५५ टक्के पाणी आहे.साधारण २० ते २२ टक्के पाणी सोडण्यामुळे कमी होणार आहे. अक्कलकोट, मैंदर्गी आणि दुधनी या तीन नगरपालिकांसह नदीकाठच्या २७ गावात सध्या पाण्याची टंचाई निर्माण झालेली
आहे.याबाबतची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली होती.त्यानंतर पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्याचा निर्णय
घेतला आहे.