ध्यास विश्वसार्ह बातमीचा

परिवहनमंत्री अनिल परब यांचा एसटी कर्मचाऱ्यांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई : करोनामुळे अनेक कुटुंब उद्धवस्त झाली. कुटुंबातील कर्ता व्यक्ती गेल्याने अनेकांचे संसार कोलमडून पडले. या पार्श्वभूमीवर करोनासारख्या महाभयंकर विषाणूची लागण होऊन मृत्युमुखी पडलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना परिवहनमंत्री अ‍ॅड. अनिल परब यांनी मोठा दिलासा दिला आहे.

करोनामुळे निधन झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी महामंडळ ठामपणे उभे असून करोनामुळे निधन झालेल्या, परंतु शासनाच्या निकषात बसत नाहीत, अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना राज्य परिवहन महामंडळाच्या निकषाप्रमाणे ५ लाख रूपयांची मदत देण्यात येईल, अशी घोषणा मंत्री ॲड. परब यांनी केली.  त्याशिवाय करोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना ५० लाख रूपये देण्याची सरकारी योजनेची मुदत एसटी कर्मचाऱ्यांसाठीही ३० जून २०२१ पर्यंत वाढवण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले.

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ अशी बिरूदावली मिरवणारी आणि ग्रामीण भागाचा आर्थिक कणा असलेली लालपरी अर्थात एसटीने ७४ व्या वर्षात पदार्पण केले. ग्रामीण तसेच शहरी भागातील चाकरमान्यांच्या हृदयात कायम स्थान असलेल्या एसटीचा मंगळवारी, १ जून २०२१ रोजी ७३ वा वर्धापनदिन पार पडला. गेल्या वर्षभरापासून सुरु असलेले कोरोनाचे संकट पाहता यंदाही एसटीचा वर्धापनदिन साधेपणाने साजरा करण्यात आला. महामंडळाच्या मुख्यालयात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल परब, परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील, महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने तसेच महामंडळातील विविध विभागांचे महाव्यवस्थापक व वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!