सोलापूर, दि.4: खरीप हंगाम पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट महिनाअखेर पूर्ण करा, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या.सर्व राष्ट्रीयकृत बँकेचे जिल्हा समन्वयक, बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. बैठकीला बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक अजय कडू, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक नितीन शेळके, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रशांत नाशिककर आदी उपस्थित होते.
श्री. शंभरकर यांनी सांगितले की, सध्या जिल्ह्याचे खरीप पीक कर्जाचे 26 टक्के वाटप पूर्ण झाले आहे. यंदा हवामान विभागाने जिल्ह्यात 101 टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला असल्याने पीक कर्जासाठी जास्त अर्ज येण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने तयारी करावी.
खरीप पीक कर्ज वाटपाच्या संदर्भात शाखांना संवेदनशील करणे, ऑनलाईन व ऑफलाईन कोणतेही पीक कर्जाची वाटप प्रकरणे शिल्लक राहणार नाहीत व खरीप पीक वाटपाचे उद्दिष्ट साध्य केले जाईल, असे बँक प्रतिनिधी यांच्याकडून सांगण्यात आले. त्याचबरोबर अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याने बँक कामकाजावर परिणाम झाल्याचे सांगण्यात आले.
जिल्हा अग्रणी बँकेने पीक कर्जासाठी ऑनलाईन अर्जाची व्यवस्था केली आहे. त्यामध्ये जवळपास 900 अर्ज प्राप्त झाले असून सर्व अर्ज बँकांकडे पाठवण्यात आले आहेत, असे श्री. नाशिककर यांनी सांगितले.
बैठकीत कर्ज वाटपाचा आढावा घेताना सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने उद्दिष्टाच्या 73 टक्के वाटप केले असल्यामुळे श्री. शंभरकर यांनी त्यांचे अभिनंदन केले.