मुंबई : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांना प्रचंड यश मिळवून दिल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे शिल्पकार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी जाऊन काल घेतली भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क वर्तविले जात आहे.
प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात तब्बल तीन तास चर्चा झाली. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेससाठी निवडणूक रणनीती आखणारे प्रशांत किशोर यांची शरद पवार यांच्याशी झालेली भेट हे देशातील आगामी राजकारणाच्या दृष्टीने महत्वाची मानले जात आहे.
पश्चिम बंगालच्या निवडणूकीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात योग्य रणनीती आखली तर त्यांचा पराभव केला जाऊ शकतो हा आत्मविश्वास किशोर यांना दिला आहे. त्यामुळे प्रशांत किशोर भाजप विरोधात विरोधी पक्षांची मोट बांधत आहेत अशी चर्चा सद्या राजकीय वर्तुळात वर्तविले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा यशस्वी प्रयोग करून दाखवला आहे. देशातील विरोधी पक्षांना भाजप विरोधात उभं करायचं असेल तर शरद पवारांचे सर्व राजकिय पक्षांसोबत चांगले संबंध आहेत. त्यामध्ये शरद पवार हे हुकुमी एक्का आहेत. याची कल्पना किशोर यांना आहे. भाजपाला रोखण्यासाठी महाविकास आघाडीचा प्रयोग केला जाणार का ? अशी ही चर्चा रंगली आहे. त्यामुळेच प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांची भेट घेऊन आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केला आहे असे मत राजकीय जाणकारांनी व्यक्त केली आहे.