ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जिल्ह्यात येणाऱ्या मराठा मंत्र्यांच्या गाडीच्या काचा फोडा; नरेंद्र पाटलांचे मराठा तरुणांना आक्रमक आवाहन

सोलापूर (प्रतिनिधी) : मराठा समाजाचे आंदोलन हे आक्रमक असेल. जिल्ह्यात येणाऱ्या मराठा मंत्र्यांच्या गाडीच्या काचा फोडा मग कळेल मराठा समाज काय आहे. या राज्य सरकारला झुकवल्या याशिवाय आता मराठा समाज गप्प बसणार नाही, असे मत अण्णासाहेब पाटील  महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केले.

कोर्टामध्ये मराठा समाजाची बाजू मांडण्यास राज्य सरकार अपयशी ठरले आहे. सरकारने मराठा समाजाची सक्षम बाजू मांडली असती  तर मराठा आरक्षण कोर्टात टिकले असते .मात्र सरकारलाच मराठ्यांना आरक्षण द्यायचे नाही म्हणून त्यांनी आरक्षणाची बाजू सक्षम मांडली नाही, असा आरोपही श्री. पाटील यांनी केला.

मराठा आरक्षण मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरातील जुनी पोलीस लाईन येथील अण्णासाहेब पाटील मंगल कार्यालयात शनिवारी मराठा क्रांती संघर्ष मोर्चा संदर्भात आयोजित बैठकीत पाटील हे बोलत होते.

यावेळी आमदार सुभाष देशमुख, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राम जाधव, किरण पवार, श्रीकांत घाडगे, अनंत जाधव, श्याम कदम, सोमनाथ राऊत, दत्ता भोसले, राम गायकवाड, जाधव सर, सचिन गायकवाड, महादेव कदम, संतोष भोसले, विजय पोखरकर, सुजित शिंदे, राजू डोंगरे, हेमंत पिंगळे, जीवन यादव, इंद्रजित पवार, महादेव वागमरे, प्रताप कांचन, अजित शिंदे, दिलीप ननवरे, उमाकांत कारंडे, युवराज पाटील, अजिंक्य पाटील, राज पवार, ललित धावणे, मनोज जाधव, सोमनाथ शिंदे, मारूती सावंत, राहुल दहीहंडे आदी मराठा समाजातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना नरेंद्र पाटील म्हणाले की मराठा समाजातील नेत्यांनी माझ्यापुढे पक्षाचे लेबल लावून येऊ नये. ज्यांना राजकारण करायचे आहे त्यांनी खुशाल करावे. पण त्यात समाजाचा विचार करावा. मी फक्त मराठा आहे असं समजून तुम्ही मोर्चात सहभागी व्हा. राजकारणाच्या वेळेला राजकारण करा. मराठा आंदोलनाला राजकारणाची जोड देऊ नका. पक्षविरहित आंदोलन झालं पाहिजे असे मतही पाटील यांनी व्यक्त केले.

यावेळी बोलताना भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यपाल, मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती यांना पत्र लिहावीत. मोर्चासाठी कोणतेही राजकारण करू नये, सर्वांनी मराठा समाजच्या पाठीमागे उभे राहावे. 58 मोर्चे निघाले त्यावेळी जी भूमिका सर्वांची होती तीच भूमिका आता देखील असावी अशी अपेक्षाही भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!