मुंबई : आमच्या हातात सूत्र द्या, ओबीसी आरक्षण परत आणलं नाही, तर राजकारणातून संन्यास घेईन, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यावर, फडणवीसांना आम्ही संन्यास घेऊ देणार नाही, असे उत्तर शिवसेना नेते आणि खासदार राऊत यांनी दिले आहे.
आम्ही देवेंद्र फडणवीस यांना संन्यास घेऊ देणार नाही. त्यांनी अशा प्रकारची विरक्तीची किंवा संन्यास घेण्याची भाषा करणे हे महाराष्ट्राच्या जनतेवर आणि भाजपवर अन्याय करण्यासारखे आहे. देशात आणि राजकारणात चांगल्या नेतृत्वाची कमतरता आहे. तशातच देवेंद्र फडणवीसांसारखे चांगले नेतृत्व फकीर होण्याची भाषा करत असतील तर ते योग्य नाही. ते लढवैय्या नेते आहेत.
भाजप व त्यांचे पुढारी विद्वान आहेत. कायदे बाज आहेत. त्यामुळे सरकारच्याच बरोबरीने ओबीसी आरक्षणाची लढाई त्यांनी सुरू ठेवावी व ओबीसींना आरक्षण मिळवून देण्यास हातभार लावावा. आम्हाला चिंता मराठा आणि ओबीसी आरक्षणाची आहेच. पण फडणवीस यांनी केलेल्या राजकीय संन्यास घेण्याच्या असल्याचे देखील आहे. फडणवीस यांनी असा त्रागा करून घेऊ नये, सर्व काही सुरळीत व त्यांच्या मनाप्रमाणे होईल. सन्यास घेतील त्यांचे दुश्मन असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
आमचं तीन पक्षांचे सरकार आहे. आमच्या पक्षांच्या विचारधारा वेगळ्या आहेत. पण आम्ही किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर एकत्र आलो आहोत. अधूनमधून भांड्याला भांडे लागत असेल तर तेही बरोबरच आहे. त्यालाच संसार म्हणतात. या आधी शिवसेना-भाजपच्या सरकारमध्ये भांड्याला भांडी केवळ लागतच नव्हती तर भांडी फुटत होती. तरीही ते सरकार पाच वर्षे चाललंच ना; मग त्यामानाने हे सरकार तर अत्यंत उत्तम चाललेले सरकार आहे. हे सरकार पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करेल, असेही राऊत यावेळी बोलताना म्हणाले.