ध्यास विश्वसार्ह बातमीचा

लग्नाच्या दिवशीच सोलापुरातील तरुणीने संपविले जीवन !

सोलापूर : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक ठिकाणी लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे मात्र अशाच एका लग्नाच्या धामधूम असलेल्या घरी मात्र शोक व्यक्त झाल्याची घटना सोलापूर शहरात घडली आहे. एका २५ वर्षीय तरुणीने विवाहाच्या दिवशीच गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना उघडकीस आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील ओम नमः शिवाय नगर, कुमठे रोड परिसरात रविवारी रात्री घरी हळदीचा कार्यक्रम होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सालिया (वय २५ वर्ष) तरुणीचे लग्ना आधीच तिने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. आत्महत्येपूर्वी सालियाने एक चिठ्ठी देखील लिहून ठेवली आहे. या चिठ्ठीत परिसरातील तीन तरुण ब्लॅकमेल करत असल्याचं तिने म्हटलं आहे. सालियाच्या मृत्युला परिसरातील तीन तरुण जबाबदार असल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे.

सालियाच्या वडिलांच्या आरोपानुसार, मुलीचे लग्न ठरल्यानंतर परिसरातील काही युवक तिला ब्लॅकमेलिंग करीत होते. आरोपींनी सालियाचे फोटो एडिट करुन ते तिच्या होणाऱ्या नवऱ्याला पाठवले होते. इतकंच नाही, तर आरोपींनी तिच्या नवऱ्याला फोन करुन देखील धमकावले होते. ही बाब उघड होताच सालियाच्या वडिलांनी तीन दिवसांपूर्वी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मात्र, या तरुणांवर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. अखेर लग्न मोडण्याच्या भीतीने सालियाने सोमवारी पहाटेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. दरम्यान, सालियाच्या मृत्युला जबाबदार असलेल्या तीन तरुणांवर तातडीने गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी तिच्या वडिलांनी केली आहे. सदरील वृत्त प्रकाशित होईपर्यंत पोलिसांनी याप्रकरणात कुठलाही गुन्हा दाखल केला नव्हता.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!