ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पहाटेच्या सुमारास झोपडपट्टीला भीषण आग

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील मुंबई शहरात गेल्या काही महिन्यापासून आगीच्या घटनेत सातत्याने वाढ होत असल्याचे दिसत असतांना नुकतेच भाईंदर पूर्वेच्या आझादनगर परिसरात असलेल्या भंगाराच्या गोदामाला बुधवारी ता.२८ पहाटे ६ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. बघता-बघता आगीने रौद्ररुप धारण करत परिसरातील काही झोपड्यांना विळखा घातला. आग लागल्याचं कळताच सर्वत्र आरडाओरड सुरू झाली. परिसरातील नागरिकांनी जीव मुठीत घेऊन बाहेर धाव घेतली.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, काही झोपड्या जळून खाक झाल्या असून काहीजण जखमी झाल्याचे वृत्त आहे. आगीमुळे सर्वत्र धुराचे लोट पसरले असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे ४ बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या आग विझवण्याचे काम सुरू आहे. भाईंदर पूर्वेकडील आझादनगर परिसर हा वर्दळीचा भाग आहे. या ठिकाणी भंगाराची दुकाने तसेच झोपडपट्टी आहे.

बुधवारी पहाटे ६ वाजेच्या सुमारास एका भंगाराच्या दुकानाला अचानक आग लागली. या आगीने काही झोपड्यांना विळखा घातला. आग लागल्याचे कळताच येथील अनेक नागरिकांनी हाताला मिळेल ते सामान घेऊन परिसर सोडला. आगीचे मोठमोठे लोळ परिसरात पसरल्याने एकच भीतीचे वातावरण पसरलं आहे. आगीत अनेकांचे घर जळून खाक झाले असल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच मीरा भाईंदर पालिकेच्या अग्निशमन दलाचे ४ बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!