ध्यास विश्वसार्ह बातमीचा

देशाच्या राजकारणात होणार मोठे फेरबद्दल ; पाटलांच्या दाव्याने राज्यात खळबळ

मुंबई : वृत्तसंस्था

आगामी विधानसभा निवडणूक जशी जशी जवळ येत आहे. तशा तशा अनेक चर्चा सुरु होत असतांना दिसत आहे. नुकतेच शेकापचे जयंत पाटील यांनी मोठा दावा केला आहे.

देशाच्या राजकारणात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. देशाच्या राजकारणामध्ये दिल्लीत येत्या महिन्यात मोठ्या उलाढाली होणार आहेत असा दावा त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे आपल्याला शरद पवार यांच्याकडूनच याबाबत माहिती मिळाल्याचा दावा त्यांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या अधिवेशनात जयंत पाटील यांनी याबाबतची माहिती जाहीर केली आहे.

यावेळी बोलतांना जयंत पाटील म्हणाले, केंद्र सरकार पडण्याच्या प्रक्रियेला आता सुरुवात होऊन ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी या सरकारचा गणपती बुडवण्याचे काम होईल. आपल्याला दोन दिवसापूर्वी शरद पवार यांचा फोन आला होता. यावेळी त्यांनी केंद्रातील सरकार पडणार असल्याचे सांगितले. यावर मी त्यांना तुम्ही सरकार पाडून या आम्ही तुमचे स्वागत करतो असे म्हणालो”, असे जयंत पाटील म्हणाले.

यावेळी त्यांनी राज्यात राजकीय नेत्यांवर सुरू असलेल्या हल्ल्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, सध्या राज्यात नेत्यांच्या गाड्या फोडण्याच्या घटना समोर येत आहेत. हे चुकीचे आहे. पूर्वी आम्हीही आंदोलनात नेत्यांच्या गाड्या अडवायचो, गाड्यासमोर झोपायचो आणि नंतर पोलिस आम्हाला पकडून घेऊन जायचे. पण आता या चुकीच्या प्रकारात गृहखाते अपुरे पडत आहे”, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे.

विशेष म्हणजे शरद पवार हे पंढरपुरात शेतकरी कामगार पक्षाच्या अधिवेशनासाठी येणार होते. मात्र पवार यांचा दौरा ऐनवेळी रद्द झाला. पवार यांनी दौरा रद्द करत असताना जयंत पाटील यांना फोन करून दिल्लीतील उलाढालींमुळे आपण येऊ शकणार नसल्याचे कारण सांगितले असे जयंत पाटील म्हणाले. शरद पवार यांनी सांगितलेल्या कारणामुळे देशाच्या राजकारणात आता खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!