जालना : वृत्तसंस्था
मराठा आरक्षणासाठीचा आपला लढा ९९ टक्के यशस्वी झाला असून आता सरकारने काढलेल्या अध्यादेशाची तातडीने अंमलबजावणी करावी आणि नवीन अध्यादेशानुसार सगेसोयऱ्यांना एक तरी प्रमाणपत्र दिले, तरीही आम्ही लढाई जिंकल्याचा आनंद होईल, असे प्रतिपादन मराठा आरक्षण लढयातील संघर्षयोद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले.
दरम्यान, अध्यादेश निघाला असला तरी आरक्षणाचा कायदा होईपर्यंत कुणीही गाफील राहता कामा नये, विरोध करणाऱ्यांना शांततेत उत्तर द्या, असे आवाहनही जरांगे- पाटलांनी यावेळी केले. शनिवारी आरक्षणाचा गुलाल उधळल्यानंतर जरांगे-पाटलांचे अंतरवाली सराटीत आगमन झाले. ग्रामस्थांनी स्वागत केल्यानंतर रविवारी सकाळी समाजबांधवांची बैठक घेऊन सरकारसोबतच्या बैठकीतील निर्णयांची समीक्षा करण्यात आली. त्यानंतर जरांगे-पाटलांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना जरांगे-पाटलांनी मुंबईत एकीचे दर्शन घडवत शांततेत आंदोलन केल्याबद्दल समाजबांधवांचे आभार व्यक्त केले. ते म्हणाले की, आपली लढाई आता निर्णायक टप्यावर आली आहे. सगेसोयऱ्यांबाबत शासनाने अध्यादेश काढला, ही स्वागतार्ह बाब आहे. परंतु, या नवीन अध्यादेशाची तातडीने अंमलबजावणी झाली पाहिजे, आरक्षणाचा कायदा होईपर्यंत नवीन अध्यादेशानुसार प्रत्येकाला प्रमाणपत्र दिले गेले पाहिजे.