मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील भाजपचे नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे सध्या त्यांनी केलेल्या विधानामुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. काँग्रेसला रामराम केल्यानंतर त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. नुकतचं त्यांनी २००८ ते २०१० हा माझ्या कारकीर्दीतील शिखराचा काळ होता, पण कुठलीही चूक न करता मला वनवास भोगवा लागला. भाजपने सन्मानाने पक्षात प्रवेश दिला असं विधान केलं होतं. आता त्यांनी केलेल्या या विधानावर उबाठा सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी चव्हाणांच्या विधानावर खोचक निशाणा साधला आहे.
काय म्हणाले होते अशोक चव्हाण?
२०१० मध्ये माझ्यावर निष्कारण खोटे आरोप करण्यात आले. त्यावेळी मला मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं. २००८ ते २०१० हा माझ्या कारकीर्दीतील शिखराचा काळ होता पण कुठलीही चूक न करता मला वनवास भोगवा लागला. भाजपने सन्मानाने पक्षात प्रवेश दिला, असं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले आहेत.
सुषमा अंधारेंनी साधला निशाणा
अशोकराव, आपण मुख्यमंत्री पदावर होतात. आपले काम अत्यंत आदर्श पद्धतीने चालू होते जर हा आपला दावा असेल तर आपल्यावर आरोप करणारे हे कोणत्या पक्षाचे होते याचे आपल्याला आकलन असेलच. ज्या भाजपने आपल्यावर आरोप केले त्याच भाजपने ब्लॅकमेल करून आपल्याला पक्षात घेतले. तुम्ही ज्याला स्व समाधानासाठी सन्मानाने पक्षप्रवेश म्हणताय त्याला व्यवहारीक भाषेमध्ये ब्लॅकमेलिंग असं म्हणतात, असा खोचक निशाणा सुषमा अंधारे यांनी एक्सवरून साधला आहे.