ध्यास विश्वसार्ह बातमीचा

“७० हजार कोटींच्या आरोपांनंतरही अजितदादा खचले नाहीत; कामातूनच दिले उत्तर” ; उद्धव ठाकरे !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्याच्या राजकारणात ठसा उमटवणारे नेते  अजित पवार यांच्या निधनानंतर विधानपरिषदेत शोकप्रस्तावावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी भावनिक शब्दांत श्रद्धांजली अर्पण केली. “७० हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप झाले, पण अजितदादा कधीही खचले नाहीत. त्यांनी आरोपांना आपल्या कामातून उत्तर दिले. त्यामुळेच आरोप करणाऱ्यांनीही त्यांना सहकारी म्हणून स्वीकारले,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

विधानपरिषदेतील भाषणात ठाकरे म्हणाले की, “विधिमंडळाचे हे पहिले अधिवेशन अशा वेदनादायी परिस्थितीत सुरू होत आहे. नेहमी सभागृहात दिसणारे अजितदादा आज आपल्यात नाहीत, ही खंत प्रत्येकाच्या मनात आहे. माणूस असताना त्याचे महत्त्व कळत नाही; तो नसताना त्याची जाणीव तीव्र होते.”

अजित पवारांच्या राजकीय आयुष्यातील “दोन सकाळी”ंचा उल्लेख करत ठाकरे म्हणाले, “एक सकाळ महाराष्ट्राला त्यांच्या कृतीने धक्का देणारी होती, तर दुसरी सकाळ राज्याच्या अंत:करणाला चटका देणारी ठरली.”ते पुढे म्हणाले की, दोन्ही पक्ष राजकीयदृष्ट्या एकमेकांच्या विरोधात असतानाही अनपेक्षितपणे ते एकत्र आले. “मुख्यमंत्री म्हणून माझा तो पहिलाच अनुभव होता. प्रशासनाची ओळख नव्हती. अशा वेळी अजितदादांसारखा धक्का दिलेला सहकारी उपमुख्यमंत्री म्हणून सोबत होता. सुरुवातीला अढी होती; पण काम करताना त्यांचा सखोल अभ्यास, निर्णयक्षमता आणि खंबीर पाठिंबा जाणवला. मी एक विश्वासार्ह मित्र गमावला,” असे ते म्हणाले.

अजित पवारांनी मोठ्या राजकीय वारशाच्या सावलीतून बाहेर पडून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली, असे नमूद करत ठाकरे म्हणाले, “अनेकांना आयुष्यभर सावलीचा आधार घ्यावा लागतो; पण काही जण स्वतःचा मार्ग तयार करतात. अजित पवार त्यापैकी होते.”

मुख्यमंत्री असताना बारामती दौऱ्याचा उल्लेख करत ठाकरे म्हणाले की, “त्या काळात माझी तब्येत ठीक नव्हती. उभे राहणेही कठीण होते. तरीही अजितदादा मुद्दाम माझ्यासोबत आले. संपूर्ण रस्त्यात त्यांनी बारामतीत केलेला कायापालट उत्साहाने दाखवला. आज त्यांच्या निधनामुळे बारामती पोरकी झाल्याची भावना होते.”

राजकारणातील आरोप-प्रत्यारोपांवर भाष्य करत ठाकरे म्हणाले, “एखाद्या व्यक्तीवर इतके आरोप करू नयेत की त्याला जीव नकोसा होईल. मर्यादा पाळली पाहिजे. अजित पवारांवर ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप झाले, पण ते खचले नाहीत. दुसरा कोणी असता तर कदाचित खचून गेला असता. त्यांनी आरोपांना कामातून उत्तर दिले आणि आरोप करणाऱ्यांनीच त्यांना सत्तेत सहकारी म्हणून स्वीकारले.”

अजित पवारांच्या भारदस्त व्यक्तिमत्त्वाचा उल्लेख करत ठाकरे म्हणाले की, “त्यांचा आवाज करडा असला तरी अभ्यासपूर्ण मांडणी आणि ठाम निर्णयक्षमतेमुळे अधिकारीही त्यांना वचकून असत.” विधानपरिषदेत त्यांच्या कार्याचा गौरव करत सर्वपक्षीय सदस्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. अजित पवारांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात एक प्रभावी आणि कर्तबगार नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!