अक्कलकोट : मारुती बावडे
७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे येथे विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तब्बल ३७९ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून समाजाप्रती आपले कर्तव्य बजावले.
या उपक्रमासाठी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतमकुमार यावलकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावर यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. रक्तसंकलनासाठी सिद्धेश्वर ब्लड सेंटर, सोलापूरचे जनसंपर्क अधिकारी नागेश चव्हाण व महात्मा बसवेश्वर ब्लड सेंटर, सोलापूरचे जनसंपर्क अधिकारी संतोष थोरात हे आपल्या कर्मचारीवर्गासह उपस्थित होते.
शिबिराचे आयोजन सुरळीत पार पडण्यासाठी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, पोलिस अंमलदार तसेच पोलीस पाटील यांनी सक्रिय सहकार्य केले.
यावेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे म्हणाले,स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून आम्ही रक्तदान शिबिराचे आयोजन केले. नागरिकांनी अपेक्षेपेक्षा जास्त उत्साहाने प्रतिसाद देऊन समाजासाठी मोठे कार्य केले आहे. रक्ताची गरज कुणालाही, कुठल्याही क्षणी भासू शकते. अशा वेळी आज केलेले रक्तदान एखाद्या जीवाला नवसंजीवनी ठरते. पोलिस दल फक्त कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठीच नाही, तर सामाजिक जबाबदारी पार पाडण्यासाठी देखील कटिबद्ध आहे, असे ते म्हणाले. या रक्तदान शिबिरामुळे अक्कलकोटसह सोलापूर जिल्ह्यातील रुग्णांना दिलासा मिळणार असून,रक्तदान हेच श्रेष्ठ दान या घोषणेला खऱ्या अर्थाने न्याय मिळाल्याची भावना रक्तदात्यांनी व्यक्त केली.