मुंबई वृत्तसंस्था : अकोट आणि अंबरनाथ नगरपरिषदांमध्ये सत्तेसाठी भाजपने अनुक्रमे एमआयएम आणि काँग्रेससोबत केलेल्या हातमिळवणीमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या ‘विचित्र’ आणि तत्वशून्य समीकरणांवर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत कडक भूमिका घेतली असून, “काँग्रेस किंवा एमआयएमसोबत कोणतीही युती खपवून घेतली जाणार नाही. अशी युती म्हणजे सरळसरळ अनुशासनहीनता आहे. ही युती तोडावीच लागेल आणि ज्यांनी ती केली आहे, त्यांच्यावर कारवाई केली जाईल,” असा स्पष्ट इशारा दिला आहे.
राज्यात आगामी महानगरपालिका निवडणुकांचे वारे वाहत असतानाच अकोट आणि अंबरनाथमधील भाजपच्या स्थानिक आघाड्यांनी सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. अकोटमध्ये एमआयएमसोबत तर अंबरनाथमध्ये थेट काँग्रेससोबत भाजपने सत्ता स्थापनेसाठी हातमिळवणी केल्याने विरोधकांनी भाजपवर जोरदार टीका सुरू केली. या घडामोडींची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक नेत्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
‘एबीपी नेटवर्क’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली. ते म्हणाले, “स्थानिक पातळीवर जरी काही नेत्यांनी असे निर्णय घेतले असतील, तरी ते पूर्णपणे चुकीचे आहेत. काँग्रेस आणि एमआयएमसोबत युती होऊच शकत नाही. हे भाजपच्या विचारधारेला धरून नाही. त्यामुळे अशी युती तातडीने तोडली जाईल आणि संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल.”
अकोट नगरपरिषदेत सत्तेचा आकडा गाठण्यासाठी भाजपने ‘अकोट विकास मंच’ स्थापन केला असून, या मंचात भाजपसह एमआयएम, शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि प्रहार जनशक्ती पक्ष एकत्र आले आहेत. या आघाडीची अधिकृत नोंदणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगरपरिषदेतही भाजपने थेट काँग्रेससोबत युती करत सत्ता स्थापनेचा मार्ग निवडला आहे. ‘काँग्रेसमुक्त भारत’चा नारा देणाऱ्या भाजपकडून काँग्रेससोबत युती होत असल्याने सर्वत्र उलटसुलट चर्चा सुरू आहेत. या युतीत शिवसेना शिंदे गटाला बाजूला ठेवण्यात आल्याने त्यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.