मुंबई : वृत्तसंस्था
सत्ताधारी शिवसेनेचा कोल्हापूर येथे महाअधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला असतांना आता युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. कितीही रडारड केली तरी तुमच्यावर असलेला गद्दार आणि बापचोर हा टॅग कधीच पुसली जाणार नाही असे आदित्य ठाकरे म्हणाले.
तसेच राहुल गांधी यांना पंतप्रधान बनायचं असेल तर, त्यांनी भाजपामध्ये जावे कारण तिथे सर्व काँग्रेसचे नेते आहेत असा सल्ला आदित्य ठाकरेंनी राहुल गांधींना दिला आहे. “महा निष्ठा, महा न्याय, महाराष्ट्राच्या माध्यमातून मुंबईत लालबाग विभाग क्रमांक 11 येथे आदित्य ठाकरे यांची तोफ धडाडली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंसह भाजपला अनेक मुद्द्यांवरून लक्षय केले. या सभेला शिवसैनिक आणि मुंबईकरांनी मोठी गर्दी केली. संपूर्ण लालबाग शिवसैनिकांच्या घोषणांनी दणाणून गेला होता.
सभेला उपस्थित शिवसैनिकांना संबोधित करताना आदित्य ठाकरे यांनी सरकारच्या नाकर्तेपणावर सडकून टीका केली. ”सध्याचं सरकार केवळ इतिहासात काय झालं त्यात अडकून पडले आहे. आपण भविष्यावर काम करणारी लोकं आहोत, पण सध्याचे सरकारकडून सगळे उद्योग गुजरातमध्ये पाठवले जात आहेत. या सरकारची फक्त टॅगलाइन बदलत असते मात्र परिस्थिती तीच राहते. ‘अब की बार 400 पार आणि वैगरे वैगरे. फक्त निवडणुका आल्या की, घोषणा बदलतात”, असे म्हणत सरकारला आदित्य ठाकरे यांनी धारेवर धरले.
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. ”गद्दारांनी आता सुद्धा काहीतरी रडारड केली. पण तुमच्यावर असलेली गद्दार आणि बापचोर ही टॅगलाइन कधीच पुसली जाणार नाही. प्रकल्प गुजरातला पळवले जात आहेत, मुंबईच्या रक्तारक्तात क्रिकेट असताना वर्ल्डकप फायनल गुजरातला झाली. पण महाराष्ट्राच्या विकासाशी सरकारला देणं घेणं नाही”, असे आदित्य ठाकरे म्हणाले.